कोथरूड, दि. 15 (प्रतिनिधी) -शहर तसेच उपनगरांत गेली काही दिवस मुसळधार पाऊस होत आहे. यातून महापालिकेच्य आपत्कालीन यंत्रणेसह इतर कामांतील त्रुटीही समोर आल्या आहेत. सोमवार (दि.10) पासून पाऊस पडू लागल्यानंतर गेल्या सहा दिवसांत उपनगरांतून सोसायट्यांच्या आवारात पाणी साचण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. क्षेत्रीय कार्यालयांतील नोंदीवरून हा प्रकार समोर आला आहे. रस्त्यांची चुकीच्या पद्धतीने झालेली खोदाई तसेच अपूर्ण कामांमुळे रस्त्यालगत असलेल्या सोसायट्यांत पाणी शिरत आहे. याबाबत मनपाकडून मिळालेल्या माहितीनुसार 138 ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी आल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
कोथरूड परिसरासह कर्वेनगर, वारजे, बावधन, माणिकबाग, दत्तवाडी, वडगावशेरी, चंदननगर, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, रामटेकडी, हडपसर, कोंढवा, येवलेवाडी, धनकवडी, ढोले रस्ता या भागातील सोसायट्यांमधून पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या.
पावसाळ्यात कोणत्या भागात पाणी साचते, याचे सर्वेक्षण महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून केले जाते. त्यानुसार पाणी साठणारी ठिकाणे निश्चित केली जातात. गेल्या वर्षी 80 तक्रारी आलेल्या असताना यावर्षी त्यात वाढ झाली. 138 ठिकाणी पाणी साठल्याच्या तक्रारी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आल्या. पावसाळी गटारांची अपुरी संख्या, रस्ता असमतोल यामुळे रस्त्यालगत असलेल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
रस्त्यांच्या “सिमेंटीकरणा’मुळे…
शहर, उपनगरांत काही वर्षांपूर्वीपर्यंत झोपडपट्टी आणि लगतच्या भागात पाणी साचण्याच्या घटना घडत होत्या. नदीपात्रालगत असलेल्या झोपडपट्ट्यांच्या परिसरात पाणी शिरत होते. मात्र, रस्त्यांचे वेगाने झालेले “सिमेंटीकरण’ त्यात पावसाळी वाहिन्यांच्या सफाईकडे झालेले दुर्लक्ष यातून बाणेर, पाषाण, औंध, कोरेगाव पार्क अशा ठिकाणीही पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या. मुळामुठा नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत सूचना द्यावा लागत असताना चुकीच्या कामांमुळे सोसायट्यांत पाणी तुंबण्याच्या घटना वाढल्याने याला कोण जबाबदार, असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.