पुणे, दि. 15 – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या मान्सूनने शुक्रवारी (दि.14) रात्री जोरदार हजेरी लावली.
परिणामी, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी आल्याने शनिवारी (दि.15) सकाळी खडकवासला धरणातून मुठा नदीत 428 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. दि. 25 सप्टेंबरनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी दि. 27 सप्टेंबर पासून पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दोन आठवड्यांनी परतीच्या पावसाने पाणलोट क्षेत्राला झोडपले आहे.
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाच ते शनिवारी सकाळी सहापर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 5, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 40, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 42 तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 50 मिमी पाऊस झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
धरणांमध्ये 99 टक्के साठा…
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये ऑक्टोबरमध्ये 99 टक्के साठा आहे. त्यामुळे, पुढील वर्षासाठीची शहराची तसेच जिल्ह्यातील सिंचनाच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. मागील वर्षीही धरणे पाणी वाटपाच्या बैठकीपर्यंत 100 टक्के भरली होती. मात्र, जून महिन्यात पाऊस लांबल्याने जुलै महिन्यात आठवडाभर शहरावर दिवसाआड पाणीकपातीचे संकट ओढावले होते. त्यामुळे, किमान यावर्षी तरी धरणातील पाण्याचे नियोजन करून ही स्थिती उद्भवणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.