अनिता कामत या निवृत्त शिक्षिका. शिक्षिका असल्यामुळेच मुलांवर आणि शब्दांवर प्रेम, जीव असणारच. शब्दांवरील या प्रेमापोटीच निवृत्तीनंतर त्यांना कवितेचं बोट धरावंसं वाटलं. एखाद्याला रंगाशी खेळावंसं वाटतं, तो रंगाचे चार दोन फटकारे ओढतो. त्यात चित्र शोधू लागतो.
काहीतरी सापडतं आणि त्या रंगाच्या फटकाऱ्याचं चित्रं होतं. अनिता कामत यांनी असेच शब्दांचे धागे हाताशी घेतले. ते शब्दांचे धागे एकमेकात गुंफण्याचा प्रयत्न केला आणि कवितेचा शेला विणला गेला. हा शेला भरजरी नाही. त्याला जरीची किनार नाही. पण या शेल्याने अनिता कामात यांच्या भावभावनांना, स्वप्नांना कवेत घेण्याचा प्रयत्न केला. ही कविता निवृत्तीनंतरच्या छंदातून आकाराला आलेली आहे. त्यामुळे तिच्यात नावीन्याच्या काही खुणा आहेत. पण कवितेने आयुष्याची काही स्पंदनं नेमकेपणाने टिपण्याचा प्रयत्न केला आहे हे नाकारता येत नाही.
शब्दांचं मोल कवयित्रीला माहीत आहे. शब्दांचा जपून वापर करावा याची जाणीव आहे. त्यामुळे संग्रहातील पहिल्याच कवितेत त्या म्हणतात –
माणसा घडवी | शब्द आणि बोल |
फार त्याचे मोल | अखंडित | |
शब्दा आहे शक्ती | वापरावी युक्ती |
नसता फजिती | अकारणे | |
माणसाने परस्परांशी संवाद साधताना, कविता लिहिताना शब्दांचा वापर युक्तीनेच केला पाहिजे. तसं केलं नाही तर तुम्ही फजिती अटळ आहे असं सांगणाऱ्या ओळी पहिल्याच कवितेत आल्यामुळे आणि कवयित्रीला त्याचं भान असल्यामुळेच संपूर्ण कवितासंग्रहात अनिता कामत यांनी शब्दांचा नेमकेपणाने वापर केला आहे असं दिसून येतं.
गोधडी या विषयावर पूर्वसुरींच्या अनेक कवींनी लिहिलं आहे. एखाद्या ठिकाणी ऐकलेली, वाचलेली कविता कवीला भुरळ घालते. तोच विषय त्याला मांडावासा वाटतो. आई, वडील, प्रेम हे मानवी जिव्हळ्याचे विषय आहेत. गोधडी हाही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळेच अनिता कामत यांनाही गोधडी या विषयावर कविता लिहावी वाटली. पण त्यांची गोधडी हि जुन्या कपड्यांची नसून आयुष्यातील आठवणींची आहे. आयुष्य या कवितेत त्या म्हणतात-
आयुष्य वहीतल्या रेघेसारखं
सरळ कधी नसतंच
मग पुढे आकारांचा, उकारांचा, मात्र्यांचा, अनुस्वाराचा, वेलांट्यांचा दाखल देत त्या सगळ्यांची आयुष्यातील चढउतार, सुखदुःखे, अडीअडचणी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
सुख-दुःख, आनंद, प्रेम, निसर्ग, पाऊस, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मानवी नातेसंबंध असे विषय या कवितांमध्ये आढळतात. या कविता मांडताना कवयित्रीने चारोळी, अभंगरचना, मुक्तछंद, अष्टाक्षरी अशा विविध काव्य प्रकारांचा आधार घेतला आहे. स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील कवितादेखील या संग्रहात आढळते.
काही मुद्रणदोष आणि व्याकरणिक चुका या कवितासंग्रहात आढळतात. परंतु त्यामुळे कवयित्रीच्या हेतूला बाधा पोहोचत नाही. कवितांचं मोल कमी होत नाही. समाजमनावर संस्कार करण्याचं, व्यक्त होण्याचं ध्येय ही कविता साध्य करते. साधंसोपं मुखपृष्ठ, डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांची प्रस्तावना, या देखील कवितासंग्रहाच्या जमेच्या बाजू आहेत.