पुणे : मानवी वस्तीत वन्यप्राणी आल्यास त्याला बघायला गर्दी न करता सृजन नागरिकांनी संयम बाळगून वनविभागाला सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच अशी परिस्थिती योग्यरित्या हाताळण्यासाठी सर्पमित्रांप्रमाणेच प्रशिक्षित प्राणीमित्रांची नेमणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटील यांनी व्यक्त केले.
फ्रेंड्स ऑफ ईकॉलॉजिकल सोसायटी आणि किर्लोस्कर वसुंधरा आयोजित ‘नगररचना आणि वन्यजीव‘ ह्या चर्चासत्रात उपवनसंरक्षक राहूल पाटील, पीएमआरडीएच्या वरिष्ठ आरेखकार रक्षदा रोडे, ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस, नगररचनाकार श्रद्धा मांजरेकर सहभागी झाले होते. ईकॉलॉजिकल सोसायटीच्या डॉ. गुरूदास
नुलकरांनी सगळ्यांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, ग्रामीण भागात वन्यजीवांबद्दलची आस्था अजूनही जागृत आहे. पण, शहरवासियांमध्ये ही संवेदना हरवत चालली आहे. त्यामुळेच वन्यजीव संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करताना वन्यजीवांचा अधिवास, ग्रीन आणि ब्लू झोन तसेच नद्यांच्या संलग्न कॉरिडॉरचा विचार केला गेला आहे, असे रोडे यांनी सांगितले. विकास आणि पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे असेही त्या म्हणाल्या.
मनुष्य-वन्यजीव संघर्षाचे वार्तांकन करताना माध्यमांनी अधिक समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. टीआरपी वाढवणारी सनसनाटी बातमी न करता परिस्थितिचे गांभिर्य लक्षात घेऊन जबाबदारीने वागले पाहिजे. वार्तांकनात सुसूत्रता आणण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे, असे ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस म्हणाले. नगररचनाकार श्रद्धा परांजपे यांनी एकूणच समाज आणि विद्यार्थ्यांमधे वन्यजीव सहजीवनाबद्दल जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे असे निदर्शनास आणून दिले.
कोथरूड येथील गव्याच्या घटनेवर विशेष लघुपट
या चर्चासत्रापूर्वी ईकॉलॉजिकल सोसायटीचे माजी विद्यार्थी पत्रकार अनूप जयपूरकर निर्मित लघुपट ‘ॲनिमल इन द सिटी’ दाखवण्यात आला. ९ डिसेंबर २०२० रोजी पुण्याच्या कोथरूड भागात अनपेक्षितपणे आलेल्या रानगव्याला पाहिला जमलेली गर्दी, घाबरून सैरभैर धावत सुटलेला रानगवा आणि त्यातच दमछाकीमुळे त्याचा झालेला दुर्दैवी मृत्यु या विषयाची प्रभावी मांडणी हा लघुपट करतो. काय करायला पाहिजे होते, काय करायला नको होते ह्याची योग्य कारणमिमांसा, विश्लेषण लघुपटात आहे. रानगव्याचा झालेला दुर्देवी मृत्यु सगळ्यांनाच अंतर्मुख करायला लावतो.