प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 -पेशवेकालीन सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या वाड्यातील गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला रविवारी सुरुवात झाली. देवघरातील पंचधातूच्या वल्लभेष दशभूज गणरायाची वाड्याच्या दिवाणखान्यामध्ये विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
शनिवारवाड्यालगत असलेल्या कसबा पेठेतील सरदार मुजुमदार वाड्यात 1714 पासून भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते ऋषिपंचमीपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येतो. गायन, कीर्तन आणि धार्मिक प्रथापरंपरेनुसार सुरू असलेल्या या उत्सवाचे यंदा 308 वे वर्षे आहे.
सनई चौघड्यांच्या मंगल सुरांत, ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत वेदोक्त पद्धतीने मयूरासनावर श्री वल्लभेष गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी समीर कुलकर्णी यांचे गायन आणि सायंकाळी श्रेयस बडवे यांचे कीर्तन झाले. उत्सवात सोमवारी (29 ऑगस्ट) श्रेयस बडवे, मंगळवारी (30 ऑगस्ट) वासुदेवबुवा बुरसे आणि बुधवारी (31 ऑगस्ट) मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांचे कीर्तन आहे. तर ऋषिपंचमीला (1 सप्टेंबर) सायंकाळी चार वाजता वासुदेव बुरसेबुवा आणि सायंकाळी सहा वाजता मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल.
उत्सव काळात दररोज सकाळी नऊ वाजता प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन होणार आहे, अशी माहिती सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांनी दिली.