नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराची प्रतिमा मलिन करण्यासाठीच सध्या भाजपचा आटापिटा चालला असून राहुल गांधी यांच्या नंतर सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस बजावली जाणे हा त्यातलाच एक प्रकार आहे असा आरोप कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. चौधरी म्हणाले की, ईडीने सोनिया गांधींयांच्या चौकशीसाठी कोणतेही सबळ कारण दिलेले नाही, केवळ गांधी परिवाराची बदनामी हा एकमेव हेतू आहूे असेही त्यांनी म्हटले आहे.
एएनआयशी बोलताना चौधरी म्हणाले, “सोनिया गांधींच्या चौकशीबाबत आम्हाला काही अडचण नाही, परंतु त्यांच्या चौकशी मागील हेतूचा आम्ही निषेध करतो. भाजपला गांधी कुटुंब आणि कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा डागाळायची आहे. त्यासाठीच अशी कटकारस्थाने रचली जात आहेत.चौधरी म्हणाले की कॉंग्रेस पक्ष गेली अनेक वर्षे सत्तेत होता, हा पक्ष घोटाळा करू शकतो यावर कोणी विश्वास ठेवेल का? “कॉंग्रेस 54 वर्षे सत्तेत होती.
54 वर्षे सत्तेत असलेला पक्ष 90 कोटींचा घोटाळा करेल, तोही सोनिया गांधी आणि राहुल गांधींसारख्या लोकांनी ज्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठी बलिदान दिले, यावर भारतात कोणी विश्वास ठेवेल का?” असा प्रश्नही त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले, “ज्या दिवशी भाजपला आदिवासी महिला भारताची राष्ट्रपती झाल्याचा अभिमान आहे, त्याच दिवशी त्यांनी चौकशीच्या नावाखाली पंतप्रधानपदाचा त्याग करणाऱ्या महिलेवर अन्याय केला.