पुणे – गांजा तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी भूषण राजेंद्र चव्हाण (रा. धुळे) याला एनडीपीएसचे विशेष न्यायाधीश ए.एन.मरे यांनी जामीन मंजुर केला आहे. त्याने ऍड. हर्षल सुनिल पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला 13 मार्च रोजी एनसीबी मुंबई झोनल युनिटने कारवाई करत अटक केली. त्याच्यावर एनडीपीएस (सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा 1985) कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे.
केवळ सहआरोपींच्या कबुली जबाबाच्या आधारे त्याला यामध्ये गोवण्यात आलेले आहे. दाखल गुन्ह्यानुसार जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा होत नाही. त्याच्या ताब्यातून कोणतीही अवैध जप्ती झालेली नाही. त्याचा सहआरोपींशी संबंध नाही. त्याला एनडीपीएस कायदा कलम 27 अ च्या तरतुदी लागू होत नाहीत. दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
त्यामध्ये त्याने गुन्हा केल्याचा कोणताही पुरावा नाही. त्याला सहआरोपीकडून रक्कम मिळालेली नाही. गुन्ह्यातील सुमारे 10 किलो गांजाची जप्ती असून, कलम 37 लागू होत नाही. सहआरोपीकडून जप्त केलेल्या गांजाचे प्रमाण व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ऍड. हर्षल सुनिल पाटील यांनी केली.