पाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी म्हटले आहे की, आम्हाला भाजप आणि जेडीयु प्रणित एनडीए सरकारमध्ये सध्या गुदमरल्यासारखे झाले आहे.
मांझी हे हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख असून त्यांचे बिहार विधानसभेत चार आमदार आहेत. येत्या विधान परिषद निवडणुकीत आम्ही आमचे अस्तित्व एनडीएला दाखवून देऊ असेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्याला या आघाडीतील मोठ्या पक्षांकडून दुर्लक्षित केले जात असल्याची त्यांची मुख्य तक्रार आहे. मांझी यांचा मुलगा बिहार सरकार मध्ये मंत्री आहे. तोही या सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
मांझी हे आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलेल्या नाराजीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.