लंडन – भारतातील लोकशाही ही एकूणच लोकशाहीचा एक मजबूत कणा आहे, आणि जर भारतात लोकशाहीच धोक्यात आली तर साऱ्या विश्वातील लोकशाहीचेच नुकसान होईल असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सध्या लंडन दौऱ्यावर असलेले राहुल गांधी हे लंडन येथे ब्रिज इंडिया नावाच्या संस्थेने आयोजित केलेल्या आयडीया ऑफ इंडिया या विषयावरील मुलाखतीत बोलत होते.
ते म्हणाले की भारतातील लोकशाही कमकुवत करणाऱ्या घटकांच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष मजबुतीने लढत आहे. आज भारतात भाजप लोकांचा आवाजच दाबून टाकत आहे. आम्हाला आज फक्त ऐकून घ्यावे लागत आहे. पण लोकांचा आवाज ऐकला जात नाही.या परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, राजदचे तेजस्वी यादव, तृणमुल कॉंग्रेसच्या महुआ मोईत्रा आदि सहभागी झाले आहेत.
राहुल गांधी म्हणाले की आज संपुर्ण भारतात केरोसीन पसरवले गेले आहे. केवळ एका ठिगणीने मोठी आग लागू शकते. ते म्हणाले की भारताची रचनाच लोकांचा आवाज ऐकण्यासाठी झाली आहे. आणि हाच लोकांचा आवाज आम्ही मजबूत करू शकतो. ते म्हणाले की भारतातील कम्युनिस्ट किंवा आरएसएस शैलीची कार्यपद्धती भारताच्या मुळ शैलीशी सुसंगत नाही. भारतातील लोकशाही हे जागतिक लोकशाहीचे वाहन आहे. पृथ्वीतलावरील लोकशाहीची हा मुख्य आधार आहे.जर या मुख्य आधारालाच धोका निर्माण झाला तर वैश्विक लोकशाहीला तडे जातील असे राहुल गांधी यांनी नमूद केले.
कॉंग्रेस पक्षाची नेमकी विचारधारा स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणाले की, आमच्यासाठी लोकांमध्ये संवाद महत्वाचा आहे, आणि संघ भाजपला भारत हा केवळ भौगोलिक भारत हवा आहे. त्यांच्यासाठी भारत ही केवळ एक सोने की चिडीया आहे. त्याचा लाभ केवळ काही लोकांनाच मिळावा असा त्यांचा ध्यास आहे. पण आम्ही मात्र याचा लाभ सर्वांनाच समान प्रमाणात व्हावा या विचारांचे आहोत.
या मुलाखतीत राहुल गांधी यांनी अनेक व्यापक विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. रशिया-युक्रेन युद्धावर बोलताना त्यांनी रशियाचा युक्रेनवरील आक्रमकपणा अमान्य केला. युक्रेनने नाटोशी संलग्नता दाखवणे पुतीन यांना पसंत नाही म्हणून आम्ही तुमच्यावर हल्ला करतो आहोत ही पुतीन यांची भूमिका आम्हाला मान्य नाही. रशियाने युक्रेन मधे जे केले तेच चीन आज भारतातील लडाख आणि डोकलाम भागात करीत आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. चीनही भारताच्या बाबतीत रशिया सारखा वागत आहे म्हणूनच तो आज लडाख आणि डोकलाम मध्ये येऊन बसला आहे असे ते म्हणाले. लडाख आणि अरूणाचल प्रदेश हा भाग आमचा आहे त्यावरील तुमचा ताबा आम्हाला मान्य नाही आणि भारताचे अमेरिकेबरोबरचे संबंध आम्हाला मान्य नाहीत ही चीनची भूमिका अगदी रशियाच्या युक्रेनच्या भूमिकेशी सुसंगत आहे असे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाच्या भवितव्यावरील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही व्यापक लोकचळवळीतून आमचे भवितव्य घडवू. त्यासाठी पक्षात आता व्यापक बदल केले जात आहेत.भारतातील सरकार देशात संस्थात्मक उभारणीवर हल्ला करीत आहे. त्यामुळे आम्हालाही यात पुढाकार घेऊन याचा बचाव करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे असे ते म्हणाले.या मुळे निर्माण होणाऱ्या संघर्षातून आम्हाला वेगळा भारत घडवता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या लढ्यातून निश्चीतच काहीं तरी चांगले बाहेर येईल असा दावाहीं त्यांनी केला.
राहुल गांधी यांचे लंडन मध्ये अनेक कार्यक्रम होणार असून ते सोमवारी केम्ब्रीज विद्यापीठात ख्रिस्ती कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.