नवी दिल्ली- आपली देशाबाबतची कर्तव्ये समजून घ्यावीत. हक्कांसाठी लढण्यापेक्षा कर्तव्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला विद्यार्थ्यांना देतानाच विद्यापीठांनी भिन्न विचारधारांसाठी कुस्तीची मैदाने बनू नयेत, अशी टिप्पणी गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे कुणी नष्ट केली, हे कुणालाही आठवत नाही. नालंदा विद्यापीठ अनेक महिने जळत होते असे सांगितले जाते. मात्र या विद्यापीठांमधील विचार आतापर्यंतही जिवंत राहिलेला आहे, याकडे शहा यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
विद्यापीठे ही मतांच्या आदानप्रदानासाठीचे व्यासपीठ असावीत, विचारधारेच्या संघर्षांची ठिकाणे बनू नयेत. एखादी विशिष्ट विचारसरणी हे कलहाचे कारण असेल, तर ती विचारसरणी नाही आणि भारताची विचारसरणी नक्कीच नाही. विचारसरणी कल्पना व चर्चा यांच्या माध्यमातून प्रगती करते, असेही शहा यांनी नमूद केले.
दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटनाच्या सत्राला संबोधित करताना शहा बोलत होते. शहा यांनी यावेळी भारताच्या संरक्षण धोरणावरही भाष्य केले.