पुणे –कात्रज चौक ते नवले पूलदरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग तयार करताना भूमिगत वीजवाहिन्या स्थलांतर न करताच रस्त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खोदकामात गेल्या सहा महिन्यांत तब्बल 35 वेळा महावितरणच्या वीजवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे कात्रज, आंबेगाव, संतोषनगर, दत्तनगर, जांभूळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, भारती विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे 45 हजार वीजग्राहकांना चांगलाच विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत असून आतापर्यंत तब्बल 47 तासांचा वीजपुरवठा या भागात खंडीत झाला असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून गेल्या दीड वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाचे तसेच कात्रज चौकाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र प्राधिकरणाकडून वीजयंत्रणा स्थलांतरित करण्यापूर्वीच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. वीजयंत्रणा स्थलांतरित करण्याचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या भूमिगत वीजवाहिन्या वारंवार जेसीबीच्या खोदकामात तोडल्या जात आहेत. आठवड्यातून असे तीन ते चारवेळा प्रकार घडत आहे. या परिसरातील सुमारे 45 हजार वीजग्राहकांना महावितरणच्या 22/22 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र खोदकामात तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे विविध भागांतील नागरिकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ड्रेनेजलाइन कामामुळेही वीजपुरवठा खंडित
प्राधिकरणाकडून सांडपाणी वाहिनी (ड्रेनेजलाइन) स्थलांतरित करण्यासाठी रस्त्यालगत खोदकाम सुरू आहे. या खोदकामातदेखील आतापर्यंत 10 वेळा भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत, तर विविध ठिकाणी एकूण सुमारे 40 तास वीजपुरवठा खंडित राहिला आहे.
संथ कामाचा फटका
रस्त्याचे काम सुरू करतानाच महावितरणकडून वीजयंत्रणा वेगाने स्थलांतरित करण्यासाठी प्राधीकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, या कामास अद्याप गती आलेली नाही. अनेकदा सायंकाळी किंवा रात्रीच्या कालावधीत खोदकाम करून वीजवाहिन्या तोडल्या जात आहेत. तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरू करणे व वाहिन्यांची दुरुस्ती करणे यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस धावपळ होत आहे.