सातारा – करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षापासून ग्रामपंचायतीच्या करवसुलीला मोठा फटका बसून गावगाड्याचा कारभार ठप्प झाला होता. मात्र, पाच महिन्यांपासून करोनाला ब्रेक लागल्याने करवसुलीला गती आली आहे. 2021- 22 मध्ये जिल्ह्यातील एक हजार 493 ग्रामपंचायतीची घरपट्टी 90.75 टक्के तर पाणीपट्टी वसुली 90.98 टक्के झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामपंचायतींची दुप्पट करवसुली झाल्याने गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
करोनामुळे मार्च 2020 पासून लॉकडाऊन होते. यादरम्यान व्यापार, व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थचक्रालाही ओहोटी लागली. याचा मोठा परिणाम गावगाडा चालविणाऱ्या ग्रामपंचायतींना बसला. परिणामी दोन वर्ष 40 ते 50 टक्के करवसुली झाली होती. ग्रामपंचायतीची वसुली कमी प्रमाणात झाल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम झाला होता. औद्योगिक कर, पाणीपट्टी कर, व्यावसायिक दुकान गाळे, स्वच्छता, आठवडे बाजार आदींमधून मिळणाऱ्या महसुलाचा स्त्रोत कमी झाला होता.
त्यामुळे ग्रामपंचायतीमधील दैनंदिन कामकाजावरील खर्च, कंत्राटी कामगारांचे पगार, स्वच्छता व इतर बाबींचा खर्च भागविताना कसरत करावी लागत होती. गेल्या सहा महिन्यांपासून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीला गती आली. जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या एकूण घरपट्टीपैकी थकीत व चालू अशी 78 कोटी 63 लाख वसुली करण्यात आली असून 36 कोटी 32 लाख पाणीपट्टी वसुली करण्यात आली आहे. गेल्या वर्षीहून दुप्पट करवसुली झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागात पुन्हा विकासाला चालना मिळणार आहे.
करोनाचा मोठा परिणाम ग्रामपंचायतींच्या करवसुलीवर झाला होता. करोनाचे संकट संपल्याने आता मार्च 2021- 22 मधील घरपट्टी व पाणीपट्टी वसुली सुमारे 90 टक्के झाली. ग्रामपंचायतीची शंभर टक्के वसुली करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात जास्तीत जास्त विकासाच्या योजना राबवण्यात येत आहे. नागरिकांनीही करवसुलीला सहकार्य केल्यास शाश्वत विकास होण्यास मदत होईल.
अर्चना वाघमळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी