मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतील इस्लामपूरमध्ये भाषण करत असताना लग्नातील कन्यादान विषयावर वक्तव्य केले. ते वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले असून ब्राम्हण समाजाकडून मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. त्यातच आज ब्राम्हण महासंघाने पुण्यातील एनसीपीच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. दरम्यान, मिटकरींच्या वक्तव्यावरून ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतो, असे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले होते मिटकरी ?
सांगलीतील सभेत बोलताना मिटकरी एक किस्सा सांगताना म्हणाले, “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटले अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं, कन्या दान काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितले अरे, ते महाराज म्हणताहेत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. कधी सुधरणा,” असे मिटकरी म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्याचा ब्राम्हण समजातून निषेध व्यक्त होत आहे. तसेच मिटकरी यांनी माफी मागण्याची मागणी केली जात आहे. मात्र मिटकरी हे आपल्या वक्तव्यावर ठाम असून त्यांनी आपण माफी मागणार नसल्याचे म्हंटले आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
“त्या सभेचा हेतू ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा नव्हता. त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतो. आमची ती भूमिकाच नव्हती. असे वक्तव्य होणे योग्य नव्हते. त्यांच्या वक्तव्यामध्ये ब्राह्मण समाजाचा उल्लेख नाही. पण मंत्रपठण वगैरेमुळे ब्राह्मण समाजात एक भावना तयार झाली आहे. मी सर्व ब्राह्मण समाजाला विनंती करेन की आमचा तो हेतू नाही. ब्राह्मण समाजासाठी आम्हाला सर्वांनाच आपुलकीची भावना आहे. त्याबाबत आमची कुणाचीही टोकाची भूमिका नाही. माझ्या व्यासपीठावर ते भाष्य झालं, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, मिटकरी यांच्या भाषणादरम्यान व्यासपिठावर जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडेदेखील होते. मिटकरी यांचे भाषण सुरु असताना जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हसताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.