गोंदवले -अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेच्या मुख्य दिवशी बुधवारी “हर हर महादेव’, “म्हाद्या धाव, म्हाद्या पाव’ अशा शिवगर्जना करत मानाच्या कावडींनी मुंगीघाट सर केला. हा सोहळा नजरेत साठवून ठेवण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांची शिखरशिंगणापूरमध्ये मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
शिंगणापूर यात्रेत चैत्र शुद्ध द्वादशीच्या दिवशी देवाच्या लग्नाची वरात म्हणून मानाच्या कावडी वाजतगाजत येऊन शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. मुंगीघाटातून कावडी चढवण्याची परंपरा सुमारे 700 वर्षांपासून प्राचीन आहे. सासवड पंचक्रोशीतील सासवड, खळद, शिवरी, बेलसर, एखतपूर, कुंभारवळण यासह
बारामती, इंदापूर, गुणवरे, माळशिरस, कण्हेर आदी ठिकाणच्या कावडी अवघड मुंगीघाट सर करत असतात. मुंगीघाट कावडी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मुंगीघाट सोलापूर जिल्हा हद्दीत आहे, तर घाटाचा माथा सातारा जिल्हा हद्दीमध्ये आहे. द्वादशीच्या दिवशी सकाळपासून सर्व कावडी मुंगीघाटाच्या पायथ्याशी इंदोरचे काळगावडे राजेंनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन घेतले.
मानाच्या कावडी सोलापूर जिल्ह्यातील कोथळे गावात जमा होतात. त्यानंतर मुंगी घटातून सुमारे तीन किलोमीटरचा टप्पा चढताना हजारो भाविक भक्तीरसात न्हाऊन निघतात. ‘हरहर महादेव’, ‘म्हाद्या धाव’ अशी शिवगर्जना करीत भाविक अवजड अशा कावडी घेऊन चार टप्प्यात मुंगीघाट सर करतात.
खड्या असलेल्या डोंगरावरुन मानवी हातांची साखळी करुन कावडी घेऊन चढवताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होते. सासवड येथील कैलास काशिनाथ कावडे यांच्या कावडीने बुधवारी सायंकाळच्या सुमारास मुंगीघाट सर करुन शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली. दोन वर्षांच्या कालावधीनंतर कावडी सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी लाखो भाविक शिंगणापूर नगरीत उपस्थित होते.