पुणे – महापालिका कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. मात्र, ही सवलत देताना त्यांच्या दैनंदिन कामाचे तास वाढविण्यात आले आहेत. पण, अनेक कर्मचारी सकाळी उशिरा आणि सायंकाळी लवकर गायब होत आहेत. करोनाचे नियम शिथिल झाले असले, तरी पालिकेतील बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बंदच आहे. याचा गैरफायदा घेतला जात आहे.
शहरात महापालिकेच्या मुख्य इमारतींसह 15 क्षेत्रीय कार्यालये तसेच इतर कार्यालयांमध्ये सुमारे 18 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना आठवड्यातील पाच दिवसच काम असते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत कामांची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
मात्र, प्रत्यक्षात हे कर्मचारी सकाळी साडेदहा वाजता येतात. तर दुपारी जेवणाची वेळ अर्धा तास असतानाही प्रत्यक्षात तासभर जातात. तर, सायंकाळी साडेपाच वाजताच कार्यालय सोडत आहेत. त्यामुळे कार्यालयीन वेळ सव्वासहा वाजेपर्यंत असली, तरी कर्मचारी अर्धा ते पाऊण तास आधीच गायब होत आहेत.
भर उन्हात अभियंत्यांची “साइट व्हिजिट’!
दुसऱ्या बाजूला मनपा स्थापत्यविषयक कामांची जबाबदारी असलेले अभियंते “साइट व्हिजिट’च्या नावाखाली दिवसभर गायब राहत असल्याचे चित्र आहे. शहरात दुपारच्या वेळेत उन्हाची प्रचंड तीव्रता असताना खरचं हे अभियंते “साइट व्हिजिट’ला जातात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिक पाणी, ड्रेनेज, रस्ते तसेच इतर तक्रारी घेऊन आल्यानंतर त्यांना अभियंत्यांकडे पाठविले जाते. मात्र, हे अभियंते “साइट व्हिजिट’च्या नावाखाली पालिकेतच येत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
कर्मचारी वेळेआधीच निघून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक यंत्रणा पुन्हा कार्यन्वित केली जाईल. तसेच महापालिकेत सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुहे कर्मचारी किती वाजता न सांगता बाहेर पडले, याची तपासणी केली जाईल. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. – राजेंद्र मुठे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, मनपा