शेट्टी-पवार यांच्या हजेरीची चर्चा : आघाडीतून बाहेर पडण्याचा फैसला लवकरच होणार
दिगंबर पडकर
जळोची – मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर नाराज असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी व उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील दोन कार्यक्रमांत एकाच व्यासपीठावर आले. मात्र, या दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळले. व्यासपीठावरून उतरताच शेट्टी यांनी शेतकरीहिताविरोधात एल्गार पुकारला. त्यामुळे दीड वर्षांपासून महाविकास आघाडीपासून शेट्टींची फारकत अद्याप कायम आहे. लवकरच ते महाविकास आघाडी सरकारमधील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचा एक घटक असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकतेच आघाडीतून बाहेर पडण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या विविध प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने बघत नसल्याने महाविकास आघाडीत राहायचे की नाही, याबाबत विचार करावा लागेल. असे म्हणून (दि.5) एप्रिल रोजी निर्णय जाहीर करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे. मात्र, असे असले तरी शेतकरी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष सतीश काकडे यांनी आयोजित केलेल्या दोन कार्यक्रमांनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर होते. त्यामुळे बारामतीसह राज्याच्या नजरा या कार्यक्रमांकडे होत्या. यावेळी शेट्टी आणि पवार यांच्या वक्तव्याबाबत उत्सुकता होती. मात्र, दोघांनी मौनव्रत धारण करणे पसंत केले.
महाविकास आघाडी सरकारवर नाराज असणारे शेट्टी कोल्हापूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारच्या कामाची चिकित्सक पद्धतीने मांडणी करणार असल्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने जे शेतकरी विरोधी निर्णय घेतले आहेत. त्याची चिरफाड या बैठकीत करण्यात येईल, अशा शब्दांत शेट्टी यांनी आसूड ओढले आहे. भविष्यात शेट्टी हे आणखी आक्रमक होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या कोल्हापूरच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
संवेदनशील प्रश्नांवर आसूड
महाविकास आघाडी सरकारने भूमी अधिग्रहण कायदा दुरुस्त करून शेतकऱ्यांचा 70 टक्के मोबदला कमी केला आहे. एफआरपी व बाजार समितीतून शेतकऱ्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा मुद्दा आदी मुद्दे, तसेच शासनाने जी ऊस दर समिती गठीत केली आहे. या समितीमधील सदस्य साखर कारखानदारांसमोर काहीच बोलणार नाही. अशी दुबळी समिती गठित केली आहे. हे संवेदनशील मुद्दे बैठकीत उपस्थित होणार आहेत. 2019 च्या तुलनेत शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र, केवळ सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरीहिताविरोधातील ज्वलंत प्रश्नांवर शेट्टी आणि त्यांची टीम आसूड ओढण्याची शक्यता आहे.