नवी दिल्ली – फिट्च या मानांकन संस्थेने चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर कमी होऊन 8.5 टक्के इतका होईल असे म्हटले आहे. अगोदर या संस्थेने भारताचा विकास दर 10.3 टक्के राहील असे म्हटले होते.
करोना संपुष्टात आल्यानंतर भारतामध्ये विविध क्षेत्रातील घडामोडी वाढणार असल्यामुळे या अगोदर भारताचा विकास दर 10.3 टक्के होईल असे आम्ही म्हटले होते. मात्र रशिया- युक्रेन युद्धामुळे भारताबरोबरच जागतिक आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होणार असल्याचे या संस्थेला वाटते. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के इतके कच्चे तेल आयात करतो.
मुळात कच्चे तेल जवळजवळ 40 डॉलरने महाग झाले आहे. या महाग कच्च्या तेलाचा भारताच्या विविध क्षेत्रावर परिणाम होणे अपेक्षित आहे. भारतामधील इंधनाचे दर गेल्या चार महिन्यापासून वाढविले नव्हते. मात्र मंगळवारी भारतात इंधनाच्या दरवाढीला सुरुवत झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढेल आणि विविध क्षेत्रात महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महागाईमुळे विक्री कमी होण्याची शक्यता आहे. केवळ भारतातच महागाई वाढणार नाही तर जागतिक पातळीवर महागाई वाढणार आहे.
त्यामुळे भारताच्या सर्वच आयातीचा खर्च वाढून चालू खात्यावरील तूट वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भारताच्या रुपयावरही परिणाम होत आहे. या सर्व बाबीचा भारताच्या विकास दरावर परिणाम होणे अपेक्षित असल्याचे दिसून येते. रशियाचा जागतिक इंधन पुरवठ्यात दहा टक्के वाटा आहे. या सर्व पुरवठ्यावर परिणाम होणार असल्यामुळे जागतिक विकास दरही कमी होऊन साडेतीन टक्के इतका होईल असे या संस्थेने म्हटले आहे. भारतामध्ये महागाई वाढत जाण्याची शक्यता असून डिसेंबरमध्ये महागाई दर सात टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असे या संस्थेने म्हटले आहे.