लखनौ -केंद्रीयमंत्री एस. पी. सिंग बघेल यांच्या ताफ्यावर मैनपुरी जिल्ह्यातील करहल येथे समाजवादी पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला, असा आरोप उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केला आहे. या मतदारसंघात त्यांची लढत अखिलेश यादव यांच्याशी आहे. बघेल यांच्या ताफ्यावर अतिकुल्लाह गावातून काही स्थानिकांनी दगड आणि काठ्यांनी हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तेथील स्थिती आता नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. काल भाजप खासदार गीता शाक्य यांच्यावरही हल्ला झाला. दोन्ही घटनांतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
अखिलेश यांच्या समर्थकांना पराभव नजरेसमोर दिसत असल्यानेच त्यांनी हा प्रकार केला आहे, असा दावा केशवप्रसाद मौर्य यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनीही समाजवादी पक्षावर सडकून टीका केली आहे.