इंफाळ -मणिपूरने मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची निवड केली. मात्र, त्या राज्याला वेगळेच सरकार मिळाले. मणिपूरची सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जनादेशाचा अनादर केला, असे टीकास्त्र कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी सोडले. मणिपूरमध्ये मागील विधानसभा निवडणुकीनंतर (2017) त्रिशंकू स्थिती निर्माण झाली.
कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. मात्र, विधानसभेच्या एकूण 60 पैकी 28 जागा जिंकून कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्यावेळी भाजपने लहान पक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केले. आता पाच वर्षांनंतर मणिपूर पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्या निवडणुकीतील कॉंग्रेसच्या प्रचारासाठी प्रियंका यांची व्हर्च्युअल सभा झाली. त्यावेळी बोलताना त्यांनी मागील निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला.
धाकदपटशा, पैशांचा वापर करून मणिपूरची सत्ता बळकावण्यात आली. गैरमार्गांचा अवलंब करून सत्तेवर येणाऱ्या सरकारचे कार्य कसे चांगले असेल? त्याउलट, सत्तेवर आल्यास कॉंग्रेस रोजगार संधी उपलब्ध करेल. त्यामुळे मणिपूरमधील जनतेला रोजगारासाठी इतरत्र जावे लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.