मुंबई : राज्य सरकारने सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाईनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विरोधकांनी विरोध करण्यास सुरु केले आहे. यात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून ते राज्य सरकारवर संतापले आहेत.
राज्य सराकरने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचं अण्णा यांनी म्हटलं. अण्णा हजारे यांनी एक पत्रक काढलं असून त्यात ते म्हणाले. राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान दारू विक्रीचा हा निर्णय राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते, अस अण्णा म्हणाले.
दरम्यान सरकारला शेतकऱ्यांचेच हित पाहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार ? असा प्रश्नही अण्णांनी उपस्थित केला.