मुंबई – गोव्यात आमची लढाई नोटांशीच आहे. भाजपची लोकं ज्याप्रकारे निवडणूकीत नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चाललेल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल, गोव्यातील जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न करेल, या नोटांच्या दबावाखाली येऊ नका. हिंदुत्ववादी हा या नोटांना पुरुन उरेल हे नक्की. देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.
आगामी गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसंदर्भातही त्यांनी वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशात सत्तांतर अटळ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले. ते तिथे गेल्यानंतर आपण पाहिल की, भाजपही फुटला. काल एका मंत्र्यांनी पक्षाचा त्याग केला. भाजप आमदार प्रवीण झाटे यांनी देखील पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत सुरु असलेले युद्ध थांबवावे. प्रश्न नोटांचा म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे.
उत्तर प्रदेशातही भाजपामध्ये लागलेली गळती ही सुरुवात आहे. ओपिनियन पोलनुसार, भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असे सांगितले जात आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प्रवास हा राजकीय परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे, असाही हल्लाबोल त्यांनी केला.