लखनौ – उत्तरप्रदेशचे 18 मंत्री आठवडाभरात त्यांच्या पदांचे राजीनामे देतील. दररोज एक-दोन मंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडतील, असा दावा प्रभावी ओबीसी नेते ओमप्रकाश राजभर यांनी बुधवारी केला.
स्वामीप्रसाद मौर्य आणि दारासिंह चौहान या उत्तरप्रदेशच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा सत्तारूढ भाजपसाठी मोठा राजकीय हादरा मानला जात आहे. अशात भाजपची चिंता आणखी वाढवणारे वक्तव्य सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) अध्यक्ष राजभर यांनी केले.
दलित, मागास आणि वंचित घटकांशी भाजपला काही देणे-घेणे नसल्याचे काही काळातच माझ्या लक्षात आले. मात्र, इतरांनी प्रतीक्षा केली. आता कुठलीच आशा न उरल्याने अनेक मंत्री राजीनामे देतील, असे त्यांनी म्हटले.
उत्तरप्रदेशातील मागील विधानसभा निवडणुकीत (2017) एसबीएसपी हा भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचा घटक होता. त्या पक्षाचे चार आमदार निवडून आले. स्वत: राजभर मंत्रीही बनले. मात्र, ते 2019 मध्ये मंत्रिमंडळातून बाहेर पडले.
भाजपबरोबरचे संबंधही त्यांनी तोडले. आता एसबीएसपीने समाजवादी पक्षाशी (सप) आघाडी केली आहे.