रंगनाथ कोकणे
महाराष्ट्रासह सबंध देशभरात सध्या कडाक्याची थंडी पडली असून येणाऱ्या काळात शीतलहरीचा हा प्रकोप वाढत जाणार आहे. जागतिक हवामान बदलांमुळे ऋतूंची तीव्रता वाढत आहे.
उत्तर भारतातील डोंगराळ क्षेत्रात होत असलेल्या हिमवृष्टीमुळे आणि थंड वाऱ्यांमुळे थंडीच्या लाटेचा प्रकोप सातत्याने वाढत चालला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड असो वा राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असो, या सर्वच राज्यांत कडाक्याच्या थंडीने लोक हैराण झाले आहेत. उत्तराखंडमध्ये नैसर्गिक जलस्रोत गोठू लागले आहेत. केदारनाथ आणि मुक्तेश्वरमधील तलावांचे पाणी गोठू लागले आहे.
श्रीनगरमध्ये दल सरोवर आणि अन्य जलस्रोतांची स्थितीही तशीच आहे. राजस्थानमधील गंगानगर, बिकानेर, नागोर, जैसलमेर, जयपूर, भिलवाडा आदी प्रमुख ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशाच्या अनेक भागांमध्ये तापमान पाच अंशांखाली तर अनेक ठिकाणी ते तीन अंशांखालीही उतरले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरासरी तापमान 5.9 अंशांच्या खाली गेले आहे तर गुलमर्गमध्ये शून्य ते 10.4 अंशांदरम्यान राहिले. पहलगाममध्ये 8.7 तर बिहारची राजधानी पाटणा येथे किमान तापमान 5.3 अंशांपर्यंत खाली उतरले. राजस्थानातील शेखावाटी येथे तापमान शून्य ते पाच अंशांच्या दरम्यान राहिले.
हिमाचल, मध्य प्रदेश या राज्यांमध्येही पारा बराच उतरला आहे. महाराष्ट्रात निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात नीचांकी नोंद झाली आहे.
एकंदरीतच देशवासीयांना गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. 1965 मध्ये थंडीच्या लाटेचा प्रकोप नऊ दिवस कायम होता. परंतु या वर्षीच्या थंडीने 1965 चा विक्रम मोडला आहे. तसेच यंदाची थंडीची लाट जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीने थंडीचा गेल्या पंधरा वर्षांचा उच्चांक गाठला असून, तेथील तापमान यंदा 4.6 अंशांपर्यंत घसरले.
या परिस्थितीचे मुख्य कारण हवामान बदलांमुळे, जागतिक तापमानवाढीत आहे. प्रशांत महासागरात “ला नीना’चा प्रभाव वाढत आहे. वास्तविक, प्रशांत महासागरातील परिस्थिती हवामानाच्या चक्रात महत्त्वाची भूमिका बजावते. ईएनएसओमुळे (अल नीनो साउथ ओसिलेशन) प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावर पाणी आणि हवेच्या परिस्थितीत असामान्य बदल घडून येतात. त्याचा परिणाम संपूर्ण जगभरातील पावसाचे चक्र, तापमान आणि वायू संचारण प्रणालीवर दिसून येतात. “ला नीना’ हे ईएनएसओच्या थंड परिणामाचे द्योतक आहे तर “अल नीनो’ हे भीषण उन्हाळ्याचे प्रतीक आहे.
दोन्हीचे प्रभाव प्रशांत महासागराच्या क्षेत्रातील सामान्य तापमानात असामान्य बदल घडवून आणतात. “ला नीना’च्या वेळी महासागरातील गरम पाण्याच्या पृष्ठभागावरून हवा पश्चिमेकडे वाहू लागते. परिणामी गरम पाण्यात हालचाल होऊन थंड पाणी पृष्ठभागावर येते. त्यामुळे पूर्व प्रशांत क्षेत्रातील तापमान सर्वसाधारण तापमानापेक्षा कितीतरी खाली उतरते.
“ला नीना’च्या प्रभावामुळे थंडीत वेगाने वारे वाहिल्याने भूमध्यरेषा आणि आसपासच्या क्षेत्रात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा खूपच कमी होते. त्यामुळे महासागराच्या तापमानाचा संपूर्ण जगाच्या तापमानावर परिणाम होतो. या परिणामांमुळे कुठे प्रचंड पाऊस, कुठे पूर तर कुठे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
आपल्या देशात उत्तरेकडील डोंगराळ भागात प्रचंड हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्यामागे या “ला नीना’चा परिणामच कारणीभूत आहे. हवामानशास्त्र विभाग आणि जगातील अन्य शास्त्रज्ञांनीही या वास्तवाला दुजोरा दिला आहे. भारतातील हवामानाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अमेरिकेच्या मेरीलॅंड युनिव्हर्सिटीतील जलवायू शास्त्रज्ञ रघू मूर्तगुडे यांच्या मते, भारतातील संपूर्ण उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतातील डोंगराळ भागात थंडीचा कडाका वाढण्याचे कारण “ला नीना’ हेच आहे.
“ला नीना’चा परिणाम भारतात हिवाळ्यातच दिसून येतो. यामुळे हवा ईशान्य दिशेने वाहते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पश्चिम विक्षोभामुळे उत्तर आणि दक्षिण भागातील हवेचा दाब कमी होतो. परिणामी देशात जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी होते. थंडीच्या लाटेचा सध्याचा प्रकोप हा त्याचाच परिणाम होय.
यंदाच्या थंडीच्या लाटेचा प्रभाव आणखी बरेच दिवस राहणार असून, येत्या 15 ते 20 दिवसांत कडाक्याच्या थंडीपासून सुटका मिळण्याची शक्यता नाही. परिणामी शहरांमध्ये प्रदूषणाचा स्तर धोकादायक पातळीपर्यंत वाढलेला राहील आणि नागरिकांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. गरज असल्यासच घराबाहेर पडावे.
विशेषतः या काळात वयस्कर लोकांनी बाहेर पडणे टाळलेलेच बरे. कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी लोक शेकोटी, गरम कपडे, टोपी, मफलर आदींचा वापर करतात. परंतु पिकांचे संरक्षण करण्यासाठी फारसे उपाय हातात नसतात. या जीवघेण्या थंडीमुळे पिके नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरीही चिंतेत आहेत.
तापमापकातील पारा उतरल्यामुळे रब्बी पिके पूर्णपणे बरबाद होऊ शकतात. भाज्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान होऊ शकते. रोपांची पाने हिरव्या रंगाची न राहता फिकट भुऱ्या रंगाची होऊ शकतात. टोमॅटो, कोबी, वांगी आणि मिरची या पिकांवर विशेषत्वाने अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दैनंदिन गरजांवर, विशेषतः अन्न, पाणी आणि वीज या सुविधांवर या लाटेचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कडाक्याची थंडी पडल्यामुळे विजेचा वापर वाढेल आणि खर्चही वाढेल.
विकासदर मंद असणे आणि दुसरीकडे महागाई यामुळे सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होईल. अशा स्थितीत अन्य साधनांवरील अवलंबित्व आणखी वाढेल आणि अन्नधान्यावर तर त्याचा परिणाम होईलच, शिवाय अर्थव्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम होतील. उर्वरित जगात कमी-अधिक फरकाने हीच स्थिती राहील. या पार्श्वभूमीवर बचावासाठी आपण सचेत असणे आवश्यक आहे.