सातारा -सातारा जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपला असली, तरी या पालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती जाणार का, याबाबतचे निर्देश नगरविकास विभागाकडून सोमवारी उशिरापर्यंत आले नाहीत. त्यामुळे पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये संभ्रम आहे. या पालिकांमध्ये प्रशासक नेमण्याबाबत नगरविकास विभागाच्या निर्णयाचे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांची मागील निवडणूक डिसेंबर 2016 मध्ये झाली होती. त्यापैकी महाबळेश्वर व पाचगणी वगळून इतर सहा पालिकांचा कार्यकाळ 26 डिसेंबर ला संपुष्टात आला. पालिका प्रशासनाने संकेताप्रमाणे सर्व सभापतींची दालने कुलूपबंद केली आहेत. या सहाही पालिकांमधील राजकीय लोकांची वर्दळ आता बंद झाली आहे. पालिकांच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी, विरोधकांमधील संघर्ष पाहायला मिळाल्या. या घडामोडींना आता विराम मिळाला असून, पालिकेत प्रशासक म्हणून कोणाची नेणमूक होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अडचणीच जास्त
पालिकांची आगामी निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. याशिवाय राज्य शासनाने पालिकांची सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुुदत संपलेल्या पालिकांच्या क्षेत्रात निवडणुकीचे वेध लागले असले, तरी अद्याप प्रभागरचनाही झालेली नाही. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने निवडणुकीत यंदा मोठे बदल दिसणार आहेत; परंतु ओबीसी आरक्षण डावलून निवडणुका होऊ नयेत, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्यामुुळे पालिका निवडणुकांमध्ये येणाऱ्या अडचणी कशा सुटणार, याचे कुतुहल आहे.