डीझेल शंभरीपार, तर पेट्रोल 111 रुपये
सीएनजीचे भावही आठवडाभरात 5 रुपये किलोने वाढले
पुणे – इंधन दरवाढीची घौडदौड सुरूच आहे. पेट्रोल, डीझेलच्या भावात दररोज लिटरमागे 20 ते 25 पैशांनी वाढ होत आहे. आठवडाभरात सीएनजीच्या भावातही सुमारे 5 रूपयांची वाढ झाली आहे. तर शनिवारी (दि. 16) पेट्रोल पाठोपाठ शहरात डिझेलच्या लिटरच्या भावाने शंभरी ओलांडली आहे. यामुळे वाहनचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तर, पर्याय नसल्याने ते मात्र हतबल आहेत.
सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांच्या भावना तीव्र आहेत. दि.31 मे रोजी शंभरी गाठलेल्या पेट्रोलचा प्रतिलिटर दर शनिवारी 110.92, पॉवर पेट्रोल-114.60, डिझेलचा दर 100.08, तर सीएनजीचा किलोचा भाव 62.10 रुपये झाला आहे. दुसरीकडे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही हे भाव परवडणारे नाहीत. त्यामुळे वाहन चालकांने नेमके काय करायचे? स्वत:ची वाहने घराबाहेर काढायची नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकीकडे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे, तर दुसरीकडे डीझेल दरवाढीमुळे खर्च वाढत आहे. पूर्वी दिवसभरात दोन ते तीन भाडे मिळायचे. आता दिवसभरात एकच भाडे मिळते. त्यामुळे उत्पन्न कमी झाले आहे. मिळणाऱ्या उत्पन्नातून घरखर्च, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांचे आजारपण, आदी खर्च भागविणे अशक्य होत आहे. डीझेल दरवाढीच्या तुलनेत वाहतूक भाड्यात कोणतीच वाढ नाही. वाहनासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्तेही फेडायचे आहेत. त्यामुळे आहे ती वाहने विकण्याची वेळ आली आहे.
– संतोष नांगरे, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड टेम्पो संघटना.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गैरसोयीची
सततच्या इंधन दरवाढीला कंटाळून अनेक वाहनचालक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आहेत. सार्वजनिक वाहतूक अनेकांच्या सोयीची नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. काही जण केवळ नाईलाज म्हणून वाहन चालवत आहेत.
स्वत:चे वाहन वापरणे अडचणीचे
करोनामुळे सर्वांच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. जगणे कठीण झालेल्या काळात आता वाहन चालविणेही अशक्य होत आहे. इंधन दरवाढ अशीच कायम राहिल्यास अनेकांना वाहन चालविणे अशक्य होणार आहे.
जीवनावश्यक वस्तू आणखी महागण्याची चिन्हे
इंधनांच्या दरात सतत वाढ होत असल्याने धान्य, दूध, भाजीपाला, डाळी आणि अन्य वस्तूंच्या किंमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीने आता 900 रुपयांचा टप्पा गाठला आहे. शिवाय, खाद्यतेलदेखील
160 ते 220 रुपये प्रतिलिटरच्या भावाने विकले जात आहे. त्यामुळे महागाईने जनता आधीच त्रस्त झाली आहे. पण, दुसऱ्या बाजूला राज्य आणि केंद्र सरकार पेट्रोल-डीझेल आणि गॅसवरील कर कमी करत नसल्याने हे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. तर, खाद्य तेलाचे आयातशुल्क कमी केल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष किरकोळ बाजारात तेलाचे भाव कमी होण्यात कमीत-कमी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात जनतेला महागाईचा आगडोंब सहन करावा लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करून दरकपात करण्याची आवश्यकता आहे.