कोंढवा- कोंढवा बुद्रुक येथे तब्बल तीन कोटी सात लाख रुपये खर्च करून महापालिकेकडून नव्याने उभारण्यात आलेली “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीमंडई’ची इमारत दोन वर्षांपूर्वी उद्घाटन होऊनही धुळखात पडून आहे.
ही भाजीमंडई तात्काळ सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करीत भाजीमंडई विक्रेते तसेच नागरीकांसाठी खुली करू, असा इशारा कोंढवा येथील जाणीव फाउंडेशनने दिला आहे.
याबाबत जाणीव फाउंडेशनचे दादाश्री कामठे यांनी सांगितले की, प्रभाग क्र.41 मध्ये व्हीआयटी चौकाजवळ ऍमेनिटी स्पेसमध्ये महापालिकेने भाजीमंडई तसेच बहुउद्देशीय सभागृह बांधले आहे. या इमारतीत भाजीपाला व फळभाज्यांचे 32 गाळे तळजमजल्यावर असून वरील मजल्यावर 5 बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आले आहेत.
यामध्ये बचत गटातील महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग व साहित्य, पदार्थ विक्री, योगा व व्यामासाठी हॉल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगूळा केंद्र, बहुदेशीय हॉल अशी रचना करण्यात आली. परंतु, भाजीमंडई व हॉलला दोन वर्षांपासून कुलूप आहे.
2019च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तत्कालिन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते. परंतु, त्यानंतर एकदाही या इमारतीत भाजी विक्री झालेली नाही. कोंढवा गावठाणात रस्त्यावर भाजीविक्री होत असल्याने वाहतुकीची समस्या कायम आहे. या प्रश्नी स्थानिक लोकप्रतिनीधींही गप्प आहेत.
पालिकाप्रशासनानेच ही भाजीमंडई सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा जाणीव फाउंडेशनचे दादाश्री कामठे, किशोर मरळ, अमोल वाघ, राकेश कामठे, किशोर आतकिरे यांनी दिला आहे.
लाखो रुपये उत्पन्नावर पाणी…
भाजीमंडईमध्ये 32 गाळे असून मनपाच्या मुल्यांकनानुसार एका गाळ्याचे मासिक भाडे 809 रुपये होते, दरमहा 32 गाळ्यांचे 25 हजार 888 तर वार्षिक भाडे 3,10,656 रुपये उत्पन्न येणे अपेक्षित होते. परंतु, गाळेवाटप झाले नसल्याने दोन वर्षाचे 6,21,312 रुपयांचे पालिकेचे उत्पन्न बुडाले आहे.
कोंढवा बुद्रुक येथील नव्याने उभारण्यात आलेल्या भाजीमंडई इमारतीतील गाळेवाटप प्रक्रिया सुरू असून साधारणतः एक महिन्यांत सर्व बाबींची पूर्तता करुन या मंडईतील गाळे भाडे तत्त्वावर देण्यात येतील. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील सर्व प्रक्रिया सुरू आहेत. – अश्विनी भागवत, भाजीमंडई निरीक्षक, महापालिका, कोंढवा-हडपसर विभाग