अरुण गोखले
कोणतीही ध्यान धारणा, उपासना करायची म्हटली तर त्यासाठी आसन हे घालायलाच लागते. आसन म्हणजे काय? तर बैठक. उपासनेसाठी बसण्याची एक विशिष्ट अशी पद्धत. उपासकाचे आसन हे कसे असावे? याबाबत संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात बरीच माहिती दिली आहे. ते आसन कुठे, कसे घालावे? ते कसे असावे? त्यावर कसे बसावे? याचे बहुमोल मार्गदर्शन दिलेले आहे.
ज्यावेळी आपण आपल्या उपास्य देवतेचे ध्यान, धारणा, जप, तप करीत असू त्यावेळी असे आसन असणे हे फार आवश्यक असते. कारण त्या तशा खास सांगितलेल्या आसनांवर बसल्याने आपल्या ध्यान धारणेस, जपा, तपास आणि अनेक सिद्धीच्या प्राप्तीत आसनाची मोठी मदत होते.
आसनात तृणासन, मृगासन, वाघ्रासन, कंबलासन, अशा आसनांचा समावेश आहे. तसेच धूत वस्राचेही आसन घालता येते.
आसनस्थ होणे हा एक स्वतंत्र अभ्यास आहे. ती शारीरिक अवस्था आहे. ती साधताना त्याचा आपल्या शरीराबरोबरच मनास कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आपले नाम, जप, तप, ध्यान साधनेतले लक्ष विचलित होणार नाही, मनाची एकाग्रता मोडणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देणे फार गरजेचे असते.
कारण कोणत्याही आसनात तुम्ही बसलात आणि जर त्या उपासनेत तुमचे मन एकाग्र नसेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आपल्या जप, तप, ध्यान, धारणा, पठण या उपासना मार्गात आसनापेक्षाही मानसिक बैठकीस जास्त महत्त्व आहे.
मानसिक बैठक यालाच संत, सद्गुरू हे “दृढासन’ असे म्हणतात. त्याचा खरा बोध हाच असतो की बा, जिवा! तू कोणत्याही आसनावर बस. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की त्या तुझ्या देहाच्या बैठकी इतकीच तुझी निश्चल अशी न मोडणारी, अस्वस्थ न होणारी, चंचलता न येणारी मानसिक दृढबैठक असणे हे फार महत्त्वाचे आहे.
आसन उत्तम असेल आणि जर मानसिक स्थैर्य नसेल तर त्यांचा उपयोग नाही. या उलट जर तुझे मानसिक दृढासन हे पक्के असेल तर अन्य व्यावहारिक आसने ही कोणतीही असली अथवा प्रसंगी नसली तरी फारसा फरक पडत नाही. कारण उपासनेत तुझ्या बाह्यआसनांना नाही तर तुझ्या अंतरिक दृढासनासच जास्त महत्त्व आहे. हे विसरून चालणार नाही.