राहुल शिंदे
नीरा -पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता तेली, मर आणि मूळकुज अशा आजाराने जेरीस आले आहे. या भागातील सुमारे 900 एकर डाळींब बागा ट्रॅक्टरच्या सहायाने उखडून टाकण्यात आल्याने पुरंदरमधील डाळिंब शेतीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
राख, कर्नलवाडी , गुळूंचे, नावळी हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. 1996 पासून या भागातील शेतकऱ्यांनी या भागात डाळींब शेतीचा प्रयोग सुरू केला.
अत्यंत कमी पाण्यात येणार पीक म्हणून हे पीक या भागात चांगलच रुजलं. डाळिंबाचा उत्तम उत्पादन घेऊन या भागातील शेतकऱ्यांनी आपली चुणूक दाखवून दिली.
डाळिंबा पासून मिळणार चांगले उत्पन्न पाहून अनेक तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा डाळींब शेती करणे पसंद केले. या तरुणांनी आधुनिक पद्धतीने शेती करीत. पुरंदरमधील डाळिंब साता
समुद्रापार युरोप खंडात जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशात पोहोचवले. विषरहित शेती करून येथील शेतकऱ्यांनी विदेशी मार्केट काबीज केले; मात्र आता या शेतकऱ्याला पुन्हा निसर्गाच्या पुढे हात टेकायची वेळ आली आहे.
पावसामुळे राहतेय आर्द्रता
गेली तीन वर्षे झाले या भागात पाऊस वाढला आहे. या भागात सतत पडणाऱ्या या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता रहात आहे. यामुळे डाळिंबाच्या मुळ्या कुजत आहेत. त्याचबरोबर तेल्या रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. मूळ कुजल्याने कमजोर झालेले झाड तेल्यामुळे उन्मळून पडत आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी डाळिंब बाग काढण्यास सुरुवात केली आहे.