नवी दिल्ली – देशातील न्यायाधीशांना धमक्या येतात, त्या विषयी तक्रार केली तर सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणा त्याकडे लक्ष देत नाहीत असा तक्रारीचा सूर थेट सरन्यायाधीश एन. व्ही रमणा यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारची महत्वाची तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयचे नाव घेऊन सरन्यायाधीशांनी व्यक्त केलेली ही टिपण्णी गंभीर स्वरूपाची मानली जात आहे.
झारखंडच्या जिल्हा न्यायाधीशांची जी हत्या करण्यात आली तो विषय सर्वोच्च न्यायालयाने हातात घेऊन त्याची स्वत:हून सुनावणी सुरू केली आहे त्याच्या संबंधात आज झालेल्या सुनावणीच्यावेळी रमणा यांनी ही तक्रार व्यक्त केली आहे. ते लोक काहींच मदत करीत नाहीत अशी हताश खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की सीबीआयचा ऍटीट्युड बदलेला नाही. जेव्हा न्यायाधीश त्यांच्याकडे, इंटेलिजन्स ब्युरोकडे किंवा अन्य यंत्रणांकडे तक्रार करतात त्यावेळी त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद येत नाही. त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. मी अत्यंत जबाबदारीने ही व्यथा मांडत आहे, असेही रमणा यांनी आज झालेल्या सुनावणीच्यावेळी नमूद केले.
झारखंडमध्ये 28 जुलै रोजी जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद हे मॉर्निंग वॉक घेत असताना त्यांच्यावर रिक्षा धडकावून त्यांची हत्या करण्यात आली आहे. सकृत दर्शनी ही घटना म्हणजे एक अपघात होता असे भासवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही हत्या असल्याची बाब समोर आली आहे. रस्त्यावर कोणीही अन्य साक्षीदार नसताना पहाटे साडे पाच वाजता हा प्रकार घडला आहे. आनंद हे अनेक महत्वाच्या खटल्यांची सुनावणी करीत होते.
अलिकडेच त्यांनी दोन गॅंगस्टर्सचा जामीन फेटाळला आहे. त्यातूनच त्यांची ही हत्या झाली असावी असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी देशभरातून आवाज उठल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वत:हून या प्रकरणाची सुनावणी सुरू केली आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी म्हटले आहे की देशभरात अनेक ठिकाणी न्यायाधीशांनाच धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. हा अत्यंत गंभीर मामला आहे. या प्रकरणी आम्ही सर्व राज्य सरकारांकडून अहवाल मागवणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.