नवी दिल्ली – देशात डेल्टा प्लस जातीच्या विषाणुंचा शिरकाव झाला असून याच जातीच्या विषाणुंमुळे देशात मोठ्या प्रमाणात करोनाची तिसरी लाट येण्याचा धोका व्यक्त केला गेला आहे. त्या अनुषंगाने सरकारने नेमक्या काय उपाययोजना सुरू केल्या आहेत याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे डेल्टा प्लस विषाणुला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू केल्या गेल्या पाहिजेत. लसीकरण झालेल्या लोकांच्या बाबतीत या विषाणुचा प्रादुर्भाव किती मोठ्या प्रमाणात होंतो किंवा कसे या अनुषंगानेही तपासण्या होण्याची गरज आहे.
भारतात करोनाच्या ज्या पहिल्या दोन लाटा आल्या होत्या त्याचा मोठा फटका देशवासियांना बसला आहे. अशा स्थितीत डेल्टा प्लस मुळे उद्भवणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या संबंधात राहुल गांधी यांनी ट्विटरवरून सरकारला हे प्रश्न विचारले आहेत.