थिरूवनंतपूरम – केंद्र सरकारने संपुर्ण देशभर मोफत लसीकरण केले पाहिजे अशी मागणी आज केरळ विधानसभेत एका ठरावाद्वारे एकमताने करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांनी हा प्रस्ताव मांडला. केंद्राने सर्वच राज्यांना वेळेवर पुरेसा लसींचा साठा उपलब्ध करून दिला पाहिजे अशी मागणीही या ठरावात करण्यात आली आहे.
समाजातील सर्वच घटकांचे या महामारीपासून संरक्षण होण्याची गरज असून त्यासाठी सर्वांनाच मोफत लस दिली पाहिजे. आरोग्यमंत्री म्हणाल्या की सर्वांचे वेगाने लसीकरण झाले की देशात करोनाची महामारी कमी होईल आणि लोक पुन्हा अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या कामी लागतील. त्यामुळे वेगाने लसीकरण अर्थव्यवस्थेलाही चालना देणारे ठरू शकते ही बाबही केंद्राने लक्षात घेतली पाहिजे.
मार्क्सवादी सरकारने मांडलेल्या या ठरावाला कॉंग्रेस व मित्र पक्षांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे हा ठराव एकमताने संमत झाला आहे. त्याच्या प्रति केंद्र सरकारलाही पाठवण्यात येणार आहेत. पण त्याचा मोदी सरकारवर कितपत उपयोग होईल याची शंकाच आहे अशी प्रतिक्रीयाही काहीं जणांनी व्यक्त केली आहे.