औरंगाबाद – उन्हाळ्याच्या दिवसात जंगली प्राणी पाण्याचा शोध घेत विहिरींजवळ येतात आणि ते विहिरीत पडून मरण पावल्याच्या घटना सतत घडत असतात. त्यामुळे जंगलानजीकच्या विहिरींभोवती कॉंक्रिटचे उंच कुंपण उभारण्याची सूचना महाराष्ट्र राज्य वाईल्ड लाईफ बोर्डाच्या एका सदस्याने महाराष्ट्र सरकारला केली आहे.
यादव तरटे पाटील असे या सदस्याचे नाव असून त्यांनी तशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवले आहे. भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी गावच्या परिसरात 32 विहिरींमध्ये ही उपाययोजना करण्यात आली आहे. केंद्रीय निधीतून सन 2019 मध्ये ही उपाययोजना करण्यात आली. त्यामुळे अनेक प्राण्यांचे जीव वाचले आहेत.
भंडारा जिल्ह्यात अलीकडेच वाघाचे दोन बछडे विहिरीत पडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी विहिरींभोवती अशी पक्की कुंपणे उभारण्याची गरज त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.