मुंबई -राज्यात करोना महामारीमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक मुलांच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरवल्याने ती अनाथ झाली आहेत. सध्या या मुलांचे भविष्य अंधारात आहे. याचं पुढे कसं होणार? असा प्रश्न आता समाजमनातून उपस्थित होत आहे.
मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात करोनामुळे आपले पालक गमावलेल्या मुलांची एकूण संख्या 195 आहे. त्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या 108 आहे. तर एकच पालक गमावलेली मुले 87 आहे.
सगळ्यात जास्त अनाथ झालेल्या मुलांची संख्या नंदुरबार जिल्हयातील आहे. नंदुरबारमध्ये तब्बल 93 मुले अनाथ झाली आहेत. त्यातील 66 मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले, तर 27 मुलांनी एकच पालक गमावले आहे.
त्या खालोखाल हिंगोली 18, जालना 16, गोंदिया 12, ठाणे 11, अहमदनगर 8, नागपूर 7, परभणी आणि पुणे प्रत्येकी 4, धुळे आणि बुलढाणा प्रत्येकी 3, तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वाशीममधील प्रत्येकी 2 मुलांनी पालक गमाविले आहेत.
या 195 पैकी 42 जणांची जबाबदारी राज्य सरकारने आधीच घेतली आहे. करोनाने अनाथ झालेल्या मुलांचा प्रश्न गंभीर झाल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला आहे. हा टास्क फोर्स त्या-त्या जिल्ह्यातील मुलांची जबाबदारी पाहणार आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. या अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणार आहे. सोबतचं प्रतिमहिना पाच हजार रुपयेही देणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या मुलांसाठी काय करणार हा प्रश्न आहे.