आगरतळा – त्रिपुरामधील आगरताळाचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करत सुरु असलेल्या एका विवाह समारंभात घुसून नवरा मुलगा, पुरोहित अर्थात पंडीतासह विवाह समारंभाला आलेल्या पै पाहुण्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ देशभर व्हायरल होत आहे. आगरतळाच्या नॉर्थ गेट, माणिक्य कोर्ट परिसरातील पॅलेस कपौंड या मॅरेज हॉलमध्ये हा विवाहसमारंभ सुरु होता. मात्र, कलम 144 (जमावबंदी) चा भंग केल्याचे कारण दाखवत यादव यांनी पोलिसांसह येथे धाड टाकून कलम 188 नुसार विवाह संयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, सदर विवाह समारंभाला यादव यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयानेच लेखी परवानगी दिलेली असल्याचे नवरदेवाचा बंधु शुभ्रजित देव याने सांगितल्यानंतर, सदर जिल्हाधिकाऱ्याच्या धुमाकूळाविरोधात प्रतिक्रिया देशभर उमटत आहेत.
सदर व्हिडीओमध्ये असे दिसते की, जिल्हाधिकारी यादव एका मॅरेज हॉलमध्ये पोलिसांसह प्रवेश करतात. तिथे जमलेल्या नागरिकांना पाहून ते शिवीगाळ करत आहेत. काही जणांना कॉलरला पकडून बाहेर ढकलत आहेत. तर डायनिंग टेबलवर जेवायला बसलेल्या लोकांना जेवण अर्धवट टाकून उठून जायला सांगत आहेत. यादरम्यान ते नवरा मुलगा आणि लग्न लावणाऱ्या पुरोहितालाही शिवीगाळ करताना आणि त्यांना हाताला धरुन बाहेर काढताना दिसत आहेत.
दरम्यान, आपण नियमानुसार कारवाई केल्याचे जिल्हाधिकारी सांगत आहेत, तर जिल्हाधिकारी कार्यालयाची लेखी परवानगी असूनही यादव यांनी विवाह समारंभात विघ्न आणल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. जर नियमांचे उल्लंघन दिसत होते, तर पंचनामा करुन कायदेशीर कारवाई करायला हवी होती, कायदा हातात घेण्याची गरज काय होती, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या मुजोरपणावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.