पुणे – भूस्खलनाचा धोका असलेल्या मुळशी तालुक्यातील घुटके गावाचे पूर्णत: पुनर्वसन करण्यात येणार आहे. पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. माळीण गावच्या धर्तीवर घुटके गावचे पुनर्वसन केले जाणार आहे. या गावात 46 कुटुंबे असून हे गाव नव्याने वसविले जाणार आहे. यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
माळीण येथे झालेल्या दुर्घटनेनंतर अशाप्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील डोंगर उतारावर वसलेली घरे, वाड्या, गावांच्या पाहणीत अशी 95 ठिकाणे धोकादायक असल्याचे समोर आले होते. या ठिकाणांची तज्ज्ञांमार्फत पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले.
यामध्ये घुटके गाव पूर्णत: स्थलांतरित करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांच्या पाहणीत स्पष्ट झाले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून या गावाचे पुनर्वसनाचा आराखडा तयार केला आहे. या गावात 46 कुटुंबे बाधित होत असून येथील लोकसंख्या 219 इतकी आहे.
घुटके गावच्या पुनर्वसनासाठी सुमारे 7 एकर जागेची आवश्यता आहे. ही जागा थेट खरेदी केली जाणार आहे. या जागेमध्ये 46 घरे बांधण्यात येणार असून एक घर सुमारे पाचशे स्केअर फुटांचे असणार आहे. ग्रामपंचायत, दोन खोल्यांची एक शाळा, समाजमंदिर, दवाखाना, स्मशानभूमी, एसटी शेड, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहे.
घुटके हे गाव पौडपासून सुमारे 56 किमी आहे. हा भाग डोंगराळ स्वरुपाचा असून डोंगराला भेगा पडलेल्या आहेत. तसेच हा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथे वार्षिक सरासरी 7 हजार 500 मिमी इतका पाऊस पडतो.