सातारा – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य गतिमान झाले आहे. त्यासाठी सर्व समाजातून निधी संकलन करण्यासाठी अभियान सुरू होणार आहे. हे श्रीराम मंदिर जगाची संस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ते म्हणाले, रामभक्तांचा पाच शतके चाललेला संघर्ष यशस्वी होऊन 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सत्य स्वीकारले. न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदिराचे कार्य पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली आहे. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी रामजन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन करून मंदिर निर्माणाच्या कार्याचा श्रीगणेशा केला. संपूर्ण देश व जगातील रामभक्तांचे डोळे त्याकडे लागले होते. निर्माणाधीन मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट व मंदिराची एकूण उंची 161 फूट, लांबी 360 फूट व रुंदी 235 फूट असेल. त्यावर पाच शिखरे असतील.
मंदिराचा परिसर 2.7 एकर जागेवर आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडांमध्ये होणार असून सिमेंट व लोखंडाचा वापर होणार नाही. मंदिर परकोटाच्या बाहेर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन इत्यादी अत्याधुनिक सोयीसुविधा असतील. हे कार्य तीन-साडेतीन वर्षांत पूर्ण होईल. मंदिराबरोबरच अयोध्येच्या विकासाचे कामही सुरू झाले आहे.बांधकामानंतर आधी संपूर्ण भारत, नंतर आशियाई देश व त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांच्या संपर्क, समन्वय, सहयोगातून हे मंदिर समरसतेचे केंद्र होईल. हे मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी होईल, असा प्रयत्न आहे.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून मकरसंक्रांतीपासून माघ पोर्णिमेपर्यंत, म्हणजे 14 जानेवारी ते 27 फेब्रुवारीअखेर निधी समर्पण अभियान संपूर्ण देशभर होत आहे. देशातील चार लाख गावे व 11 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प आहे. यासाठी अडीच लाख रामभक्त सक्रिय झाले आहेत. अभियानातील पारदर्शकतेसाठी न्यासाच्यावतीने पावती पुस्तके, दहा, शंभर व एक हजार रुपयांची कूपन्स काढून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील. महाराष्ट्रात हे अभियान उद्या, दि. 15 ते 31 जानेवारी या कालावधीत होईल.
सातारा जिल्ह्यातील 1400 गावांमधील चार लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. निधी संकलनाची सुरुवात सातारा शहरातील कुबेर विनायक, गोरा व काळाराम मंदिरातून होत आहे. यावेळी निधी संकलन अभियानाचे प्रमुख मोहन साठे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटन मंत्री सुभाष दर्भे, सीए. बाळासाहेब तथा सु. ग. स्वामी, पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत बाबुजी नाटेकर उपस्थित होते.