पुणे – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयसीएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) व आयएससी (बारावी) परीक्षांचे निकाल रविवारी दुपारी जाहीर करण्यात आले. यात देशाचा दहावीचा निकाल हा 98.94 टक्के, तर बारावीचा निकाल 96.93 टक्के लागला आहे. या दोन्ही परीक्षांच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी व बारावीच्या निकालात घट झालेली आहे.
दहावीची परीक्षेसाठी 2 हजार 616 शाळांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी एकूण 2 लाख 37 हजार 631 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात 1 लाख 28 हजार 131 मुले तर 1 लाख 9 हजार 500 मुली सहभागी झाल्या होत्या. यात 1 लाख 26 हजार 474 मुले तर 1 लाख 8 हजार 640 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. मुलांचा 98.71 टक्के तर मुलींचा 99.21 टक्के याप्रमाणे निकाल लागला आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल हा 0.5 टक्क्याने अधिक लागला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी 1 हजार 291 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी एकुण 98 हजार 505 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यात 51 हजार 781 मुले तर 46 हजार 724 मुलींचा समावेश होता. परीक्षेत 49 हजार 687 मुले तर 45 हजार 796 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. मुलांचा निकाल 95.96 टक्के तर मुलींचा निकाल 98.01 टक्के एवढा लागला आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल हा 2.05 टक्क्याने अधिक लागला आहे.
गेल्या वर्षी दहावीचा निकाल 99.97 टक्के तर बारावीचा 99.38 टक्के लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल 1.03 टक्क्यांनी तर बारावीचा निकाल 2.45 टक्क्यांनी घटला आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाचा दहावीचा निकाल 99.81 टक्के तर बारावीचा निकाल 98.34 टक्के लागला. विभागनिहाय निकालामध्ये दहावीच्या निकालात पश्चिम विभागाने 99.81 टक्क्यांसह देशात अग्रस्थान मिळवले तर बारावीच्या निकालात 99.20 टक्क्यांसह दक्षिण विभागाने बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करु शकतात. ही सुविधा रविवार दुपारी 3 वाजता सुरु झाली असून ती येत्या 21 मे पर्यंत सुरु राहणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
गुणवंतांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी झळकले
इयत्ता दहावीच्या परीक्षेत 99.08 टक्के गुणांसह पहिला क्रमांक मिळवणाऱ्या देशातील नऊ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये श्रेया उपाध्याय, कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमधील तनय शाह, चॅम्पियन स्कूलमधील अद्वय सरदेसाई, मालाडच्या सचिर्ल्डरन्स अकॅडमीतील हिया संघवी, ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील यश भसीन यांचा समावेश आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेत 99.75 टक्के गुणांसह देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांमध्ये ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील इप्सिता भट्टाचार्यचा समावेश आहे.