नवी दिल्ली : देशभरातील जवळपास 28 विरोधीपक्ष एकत्र येऊन सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी एकत्र येत आहेत. तर दुसरीकडे एका सर्वेक्षणातून एक माहिती समोर आली ज्यामुळे विरोधकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि प्रभावाबाबत प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. दहापैकी आठ म्हणजेच 80 टक्के भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. G20 परिषदेपूर्वी हा अहवाल जारी करण्यात आला.
सर्वेक्षणात जगभरातील लोकांचे भारताविषयीचे मत सामान्यत: सकारात्मक होते, सरासरी 46 टक्के लोकांनी भारताबाबत अनुकूल मत व्यक्त केले. तर 34 टक्के लोकांचे मत नकारात्मक होते. याशिवाय 16 टक्के लोकांनी तटस्थ राहण्यसला पसंती दर्शवली असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे सर्वेक्षण जगातील 24 देशांमध्ये 20 फेब्रुवारी पासून 22 मे दरम्यान करण्यात आल्याचे प्यू रिसर्च सेंटरने जारी केलेल्या अहवालात सांगितले आहे.
सर्वेक्षणादरम्यान 30861 लोकांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे जागतिक मत आणि इतर देशांबद्दल भारतीयांचे मत तपासण्यात आले. प्यू रिसर्च सेंटरने भारतीयांनी आवडीनिवडी आणि नापसंतीबाबत सर्वेक्षणाच्या अहवालात माहिती दिली आहे.
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात परदेशातील भारतीयांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा विश्वास व्यक्त दाखवला आहे. दहापैकी आठ भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यापैकी बहुतेकांचा (55 टक्के) दृष्टिकोन ‘अत्यंत सकारात्मक’ आहे. मोदी 2014 पासून सत्तेत आहेत आणि पुढच्या निवडणुकीत तिसरी टर्म देखील तेच पंतप्रधान असावेत असे त्यांचे मत आहे. 2023 मध्ये केवळ 20 टक्के भारतीयांनी मोदींबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. याशिवाय दहा पैकी सात भारतीयांना वाटतं की गेल्या काही वर्षात भारताचा प्रभाव अधिक मजबूत होत आहे. तर पाचपेक्षा कमी जणांना भारताचा प्रभाव कमकुवत झाल्याचे वाटते.
नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे परदेशात भारताचा दर्जा उंचावला आहे हे बहुतांश भारतीय मान्य करतात. आंतरराष्ट्रीय प्रकरणात योग्य पावलं उचललण्यावरुन पंतप्रधानांवर 37 टक्के लोकांचा विश्वास आहे तर 40 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास नसल्याचं सांगितलं. जगामध्ये भारताचा दबदबा वाढला आहे का, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना 68 टक्के लोकांनी पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा प्रभाव वाढल्याचे सांगितले.
प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात इस्रायलमधून आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या 73 टक्के लोकांचा भारतावर विश्वास आहे. दुसरीकडे भारतीयांचा अमेरिकेवरील विश्वास वाढला असला तरी रशियावरील विश्वास कमी झालेला नाही. 65 टक्के भारतीयांचे मत आहे की अमेरिकेची भूमिका भारताच्या हिताची आहे तर 57 टक्के लोक रशियाला भारताचा मित्र समजत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.