रांची – भाजपकडून सर्रासपणे फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जातो. अशात मागील १० वर्षांत इतर पक्षांच्या देशभरातील तब्बल ७४० आमदार आणि खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) केला. संबंधित आमदार-खासदारांपैकी अनेकांवर भाजपनेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, असेही त्या पक्षाने म्हटले.
झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांना नुकतीच ईडीने अटक केली. त्याआधी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने झारखंडमध्ये नेतृत्वबदल झाला. त्या पार्श्वभूमीवर, झारखंडमधील आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या झामुमोचे प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीकेची झोड उठवली.
भाजपच्या दृष्टीने स्वपक्षात असणारे स्वच्छ असतात. तर, विरोधात असणारा प्रत्येक जण भ्रष्ट असतो. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात असणाऱ्यांना ते देशविरोधी ठरवतात. भाजप एकेकाळी कॉंग्रेसमुक्त भारत बनवण्याची घोषणा करत होता.
मात्र, आता भाजपच कॉंग्रेसयुक्त बनला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार, खासदारांमध्ये कॉंग्रेसजनांची संख्या मोठी होती, असे त्यांनी म्हटले. काय खावे, काय परिधान करावे यासंदर्भात आदेश जारी करण्यासारखे अनेक विचित्र प्रकार देशाने मागील १० वर्षांत अनुभवले, अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी केली.