भोपाळ– भाजपने 5 कन्यांना जन्म दिला आहे, अशी टीका केल्यामुळे मध्यप्रदेशातील माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते जीतू पटवारी यांच्यावर जोरदार टीका व्हायला लागली आहे. भाजपला लक्ष्य
करत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. भाजपने “विकास‘ नावाचा मुलगा मिळवण्याच्या प्रयत्नात नोटबंदी, जीएसटी, महागाई, बेरोजगारी आणि मंदी या 5 कन्यांना जन्म दिला आहे, असे ते म्हणाले
होते. त्यावर टीका करताना भाजपने पटवारी यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. पटवारी यांचे ट्विट म्हणजे अत्यंत आक्षेपार्ह आहे. यातून कन्या या नकोशा असतात, असाच अर्थबोध होतो
आहे, असे भाजपने म्हटले आहे.
भाजपच्या बरोबर सोशल मिडीयावरील अनेक नेटकऱ्यांनी पटवारी यांच्यावर जोरदार टीका केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते
संबित पात्रा यांनी पटवारी यांच्या पोस्टला टॅग केले आणि या आक्षेपार्ह पोस्टची दखल घेण्याची विनंती केली. रेखा शर्मा यांनी या ट्विटच्या आधारे पटवारी यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही पटवारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकिकडे सर्व देश राणी दुर्गावतीच्या त्यागाचे स्मरण करतो आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेस आपल्या कन्यांचा
अपमान करतो आहे. नैना साहनी, सरला मिश्रा, प्रिती मिश्रा यासारख्या अनेक कन्यांच्या बलिदानाची दखल तरी कॉंग्रेसने घेतली आहे का ? असा सवालही त्यांनी केला.
वाद निर्माण व्हायला लागल्यावर पटवारी यांनी बुधवारी रात्री आपले ट्विट डिलीट केले आणि दिलगीरी व्यक्त केली. “कन्या या देवतेसारख्या असतात. भाजप आपला कमकुवतपणा लपवत आहे, हे
दर्शवण्यासाठीच आपण हे ट्विट केले होते. संपूर्ण देश आजही विकासाची वाट बघतो आहे, असेच आपल्याला म्हणायचे आहे.‘ अशी सावरासावर पटवारी यांनी केली.
——————————————————-