उठल्या-सुटल्या भ्रष्टाचाराचा बाऊ करून देशाची प्रतिमा निष्कारण डागळवू नका!
नवी दिल्ली, दि. 22 – पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी असा इशारा दिला की, उठल्या-सुटल्या भ्रष्टाचाराचा बाऊ करणारे लोक देशाच्या निर्यात व्यापारास खीळ घालतात. कारण भ्रष्टाचाराविरूद्ध मोहीम सुरू करणाऱ्या लोकांमुळे देशाची प्रतिमा विकृत स्वरूपात जगापुढे उभी राहते.
त्या पुढे म्हणाल्या, भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यात माझा पक्ष व सरकार कोणाच्याही मागे राहणार नाही. मग तो भ्रष्टाचार कोठेही होवो व कोणत्याही स्वरूपात उभा राहो; शिवाय हा भ्रष्टाचाराचा रोग सर्व देशांतून आहे. परंतु आपल्या देशात मात्र त्याचे अवास्तव स्वरूप दाखविले जात आहे.
गरिबी नष्ट करण्यासाठी तोडगा
नवी दिल्ली – कृषिमंत्री जगजीवनराम म्हणाले, देशातील गरिबी केव्हा नष्ट होईल? संपत्तीचे व शेती उत्पादनाचे समान वाटप केले, कारखान्यांतील उत्पादन वाढविले म्हणजे गरिबी नष्ट होईल.
इंदिराजींना मुंबई कॉंग्रेस पुष्पहार घालणार नाही
मुंबई – पंतप्रधान इंदिरा गांधी येथे येणार आहेत. त्यावेळी खर्चात काटकसर म्हणून नित्याची प्रथा सोडून त्यांना पुष्पहार घालण्यात येणार नाहीत, असे मुंबई कॉंग्रेसने ठरविले आहे. या हारासाठी जो खर्च होईल तेवढा पैसा पंतप्रधान निधीस देण्यात येईल.
भारत-रशिया व्यापारी वाटाघाटी
नवी दिल्ली – भारत व रशिया यांचे प्रतिनिधींनी येथे उभय देशांतील व्यापाराबाबत वाटाघाटी सुरू केल्या. त्यामुळे व्यापार 550 कोटी रुपयांवर जाईल.