मालमत्तेत वाटणी मागाल तर संबंध सुधारणे कठिण
रावळपिंडी, दि. 21 – पाकचे पंतप्रधान भुट्टो म्हणाले, बांगलादेशचे पंतप्रधान शेख मुजीब हे जर पाकच्या मालमत्तेत वाटा मागत असतील तर त्या देशाशी पाकचे संबंध सुधारणे कठिण आहे. त्याचप्रमाणे काश्मीरबाबतही भारताशी पाकची तडजोड तोवर शक्य नाही, जोवर भारत काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाचे तत्त्व मान्य करणार नाही.
किमती उतरत आहेत
मद्रास – कापड, धान्य, पोलाद यांच्या घाऊक किमतीत उतार होत असण्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री सी. सुब्रह्मण्यम यांनी दिली. चलनवाढीस आळा घालून किमती रोखणे हा सरकारचा प्रथम प्रयत्न आहे.
खासदारांना जादा प्रवास भत्ता
नवी दिल्ली – खासदारांचा प्रवास भत्ता 32 पैशावरून एक रुपयापर्यंत वाढवावा, या मागणीस आज राज्यसभेत मान्यता देण्यात आली. सदर विधेयक लोकसभेत यापूर्वीच संमत झाले आहे. यावेळी पुष्कळसे विरोधीपक्षीय सदस्य उपस्थित नव्हते.
आयात परवाना प्रकरणी
संसदीय चौकशी समिती नेमा
नवी दिल्ली – आयात परवाना प्रकरणी संसदेतर्फे चौकशी समिती स्थापन करावी, ही मागणी सत्तारूढ पक्षाने फेटाळल्यामुळे आज राज्यसभेत सर्व विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. कम्युनिस्ट सभासद मात्र यावेळी सभागृहात बसून होते. दोन्ही गृहांच्या सभासदांची गुप्त बैठक बोलावल्यामुळे विरोधकांनी दोनदा सभात्याग केला.