देशातील 24 महापालिकांचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती सोपवा
पुणे, दि. 17 – देशातील 34 पैकी 24 महानगरपालिकांचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती नाही याकडे शासनाचे लक्ष वेधणारा ठराव मनपाच्या सभेत एकमताने मान्य करण्यात आला. या ठरावात म्हटले आहे की, कारभाराचे विकेंद्रीकरण व सार्वजनिक लोककल्याणात सहभागी होणे सर्वमान्य आहेत. या 24 महानगरपालिकांचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधीच्या हाती द्यावा यासाठी महापौर परिषदेने डझनावर ठराव करून शासनाचे लक्ष वेधले आहे.
गरिबीचा विचार न करता ज्ञानोपासना करा
सांगली – शाळा माऊलीच्या पंखाखाली वावरणाऱ्या गरुडाच्या पिल्लांनो अडीअडचणींचा, गरिबीचा विचार न करता ज्ञानोपासना करा, म्हणजे तुमच्या देखील जीवनात प्रकाशाची रेषा उमटेल, असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू बॅ. पी. जी. पाटील यांनी काढले.
जे.पीं.चे आंदोलन न्यायासाठी आहे – प्रा. एन. डी. पाटील
कोल्हापूर – जयप्रकाश यांचे आंदोलन देशातील कष्टकरी, कामकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा देणे व त्यासाठी सर्व ते कष्ट सहन करण्याची तयारी ठेवणे हे जनतेचे कर्तव्य आहे, आणि याच उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाने त्यास पाठिंबा दिला आहे, असे उद्गार शे.का.पक्षाचे सरचिटणीस प्रा. एन. डी. पाटील यांनी काढले.
सरहद्द प्रांतात बंडाळी मोडून काढण्यासाठी केंद्रीय राजवट जारी
नवी दिल्ली – नॅशनल अवामी पक्षावर बंदी घालून त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना अटक केल्यानंतर एक आठवड्याने आज पाकिस्तान सरकारने वायव्य सरहद्द प्रांतातील बंडाळी मोडून काढण्यासाठी तेथे केंद्रीय राजवट जारी केली. वायव्य सरहद्द प्रांताचे राज्यपाल मेजर जनरल सैद घावास यांना केंद्र सरकारतर्फे सर्व अधिकार हाती घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही कारवाई तात्पुरती असून ती 90 दिवसांपुरतीच आहे, असेही जाहीर करण्यात आले.