सात कलमी आर्थिक उद्दिष्टे जाहीर
नवी दिल्ली, दि. 27 – जनता सरकारच्या आर्थिक धोरणाची सात उद्दिष्टे केंद्रीय अर्थमंत्री एच. एम. पटेल यांनी जाहीर केली. 1) शेती विकासास प्राधान्य 2) शेतीवर आधारित उद्योगांचे जाळे 3) लघुउद्योग, कुटिरोद्योग, स्वयंरोजगारास उत्तेजन 4) ऊर्जा, पेट्रोलियम, खते, पोलाद, सिमेंट व इंजिनिअरिंगला प्रोत्साहन 5) “वेज गुड्स’चा पुरेसा पुरवठा 6) चलनवाढीवर नियंत्रण ठेवून जीवनावश्यक वस्तू सामान्य माणसाला परवडतील अशा किमतीत मिळण्याची तरतूद करणे 7) विभागीय विषमता व सबल आणि दुर्लब घटकांतील विषमता नष्ट करणे.
पाककडून हिंदला भट्टीचे तेल
नवी दिल्ली – पाकिस्तान भारताला आणखी 1 लाख 40 हजार टन भट्टीचे तेल व 36 हजार टन नॅप्था हे रसायन निर्यात करणार आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये हे तेल पाठविण्यात येईल. “इंडियन ऑइल’च्या व “पाकिस्तान आइल रिफायनरी’च्या अधिकाऱ्यांत जी बोलणी झाली, त्यातून हा निर्णय घेण्यात आला.
हरिजनांच्या सुरक्षेसाठी सर्वपक्षीय समिती
पाटणा – हरिजन, आदिवासी व इतर दुर्बल घटकांचे जीवित-वित्त सुरक्षित राहावे, या दृष्टीने एक सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याचे बिहार सरकारने योजिले आहे. काल मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनी एका निवेदनाद्वारे हे
जाहीर केले.