पिंपरी – तरुणीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या आणि ऍसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर नातेवाईकांनी तलवारीने हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पिंपरी भाजी मंडई येथे घडली.
आकाश विष्णू साळवी (वय 22, रा. पिंपरी) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 19 वर्षीय तरुणीने गुरुवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी डेअरी फार्म रोड येथून चालली होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी साळवी याने तिच्या गाडीची चावी काढून घेतली. त्यानिमित्ताने तिच्याशी झटापट करीत तिचा विनयभंग केला. तसेच ही घटना घरच्यांना सांगितल्यास ऍसिड टाकण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनावणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
या घटनेचा राग मनात धरून गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणीच्या पाच नातेवाईकांनी आकाश याचे पिंपरी भाजी मंडई परिसरातून अपहरण केले. त्यास पिंपरी चिंचवड लिंक रोडवर घरकुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी सुरवातीला लाथा बुक्क्यांनी नंतर लाकडी दांडके लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर आणखी एकाने तलवारीने वार करून आकाश याला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी आकाश याचे वडील आणि लहान भाऊ यांनाही मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी पाच आरोपींना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे याबाबत अधिक तपास करीत आहेत.