सातारा – करोनाने सर्वसामान्य माणसांचे आयुष्य अडचणीत आले आहे. त्यासाठी सर्व व्यवहार व व्यापारांना नियंत्रित प्रमाणात सवलत देणे गरजेचे आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सर्व काही सुरू असताना साताऱ्यात का नाही, असा सवाल भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. सकाळी अकरा ते दोन या वेळेत करोना येत नाही का, अशी विचारणा करणारी टिपणीही उदयनराजे यांनी केली.
उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची शनिवारी सकाळी भेट घेतली. कोविड टास्क फोर्सच्या माध्यमातून बरेच प्रश्न सोडवता येतील, असे उदयनराजे यांनी सांगत सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलता होते. उदयनराजे म्हणाले, “करोना संसर्ग रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने काही उपाययोजना सुचविल्या आहेत.
करोनाचा संसर्ग रोखणे हे केवळ सरकारची नव्हे तर नागरिकांचीसुद्धा जबाबदारी आहे. करोना नियंत्रणासाठी दिल्लीच्या धर्तीवर होम क्वारंटाइनची पद्धत साताऱ्यात राबवावी.’ सौम्य व लक्षणेविरहित रुग्णांना घरीच थांबून उपचार करण्यास परवानगी दिली जाते. तसा प्रयोग सातारा जिल्हयात करावा, अशी सूचना उदयनराजे यांनी केली. लॉकडाउन हा विषय मला पटत नाही. दिल्लीत सर्व काही सुरू आहे.
त्यामुळे साताऱ्यातही सर्व काही लवकरात लवकर सुरू करा, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. किती दिवस लोकांना घरात थांबवून ठेवणार आणि दोन वाजेपर्यंत करोना नाही, त्यानंतर बाहेर येतो का, असा प्रश्न पडला आहे. करोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी केवळ शासनाची नाही तर आपल्या प्रत्येकाची आहे. प्रत्येकाने स्वत: वर बंधने घालून घेतली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काहींचे हातावर पोट असून काहींनी कर्ज काढले आहे. त्यांना बॅंकांनी मुभा दिली असली तरी लॉकडाउन उठल्यावर या व्यावसायिकांना मागील व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे लोक गप्प बसणार नाहीत. लोकांचा संयम सुटला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व काही सुरू करा, अशी सूचना त्यांनी केली असून लवकरच लॉकडाउन उठविले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे उदयनराजेंनी नमूद केले.