पुणे/बिबवेवाडी – गंगाधाम परिसरातील खासगी करोना उपचार आरोग्य केंद्रात एका रुग्णाची तब्येत अचानक गंभीर झाली. अतिदक्षता विभागात (आयसीयू) रुग्णास ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. परंतु, या रुग्णाच्या घरातील सर्वच जण याच आरोग्य केंद्रात उपचार घेत असल्याने सांगायचे तरी कोणाला? असा प्रश्न डॉक्टरांसमोर होता. त्यावेळी पहाटेचे तीन वाजले होते. रुग्णास तातडीने अन्य रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे होते. वेळ वाया चालला होता. त्यामुळे डॉक्टरांनी जबाबदारी घेत निर्णय घेतला.
आरोग्य केद्राच्या आवारात रुग्णवाहिका उभी होती. परंतु, तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णवाहिकेचा चालक आलेला नव्हता. ऐनवेळी बदली चालकाशी फोनवर संपर्क होत नव्हता. 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका उपलब्ध होते का, याची माहिती घेतली तर किती वेळ लागेल, हे सांगता येत नसल्याचे सांगण्यात आले.
या सगळ्यात वेळ जात असताना रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती. डॉक्टरांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला; परंतु रुग्ण अत्यवस्थेत जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता रुग्णवाहिकेची चावी आरोग्य केंद्राच्या प्रशासनाकडून मागवून घेतली. रुग्णाबाबत योग्य त्या सूचना देत तयारी करण्यास सांगितले आणि स्वत: रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हातात घेतले. हे पाहून काही क्षण इतर सर्व कर्मचारी गडबडले; परंतु डॉक्टरांनी तातडीने हालचाली करीत रुग्णवाहिका दीनानाथ रुग्णालयात आणली. तेथेही बेड उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर तेथून रुग्णवाहिका बिबवेवाडीतील सह्याद्री रुग्णालयात आणण्यात आली, तेथेही बेड उपलब्ध झाला नाही. रुग्णवाहिका गरवारे महाविद्यालयासमोरील सह्याद्री रुग्णालयात आणण्यात आली. याठिकाणी अत्यवस्थ रुग्णास अतिदक्षता विभागात (आयसीयू) मध्ये नेण्यात आले. आज, या रुग्णाची तब्येत सुधारली असून त्याचे प्राण वाचले आहेत.
वेळेच गांभीर्य ओळखून तातडीने योग्य निर्णय घेत आपली भूमिका आणि जबाबदारी डॉक्टरांनी घेतल्याने अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचू शकले. डॉ. रणजीत निकम आणि डॉ. राजपुरोहित या डॉक्टरांनी पुन्हा एकदा “देवपण’ समाजाला दाखवून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.