नवी दिल्ली : पाकिस्तानचा पुळका असणाऱ्या चीनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत नाहक काश्मीर मुद्दा उपस्थित केला. चीनच्या त्या लुडबुडीवर भारताने जोरदार आक्षेप घेतला. भारताच्या वतीने चीनला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले.
जम्मू, काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. त्या भागांशी संबंधित घडामोडी पूर्णपणे भारताच्या अंतर्गत बाबी आहेत. आमची भूमिका चीनला ज्ञात आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व यांचा इतर देश आदर राखतील अशी अपेक्षा आम्ही करतो. पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) अवैध चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉरच्या माध्यमातून कुणी मूळ स्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नये, अशा तीव्र शब्दांत त्यांनी चीनला ठणकावले.