- दिवसाआड सुट्टी ः गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न
पिंपरी – आयटी व्यतिरक्त शहरात मोठ्या प्रमाणात वाहन निर्मात्या, इंजिनिअरिंग आणि वाहन उद्योगांशी निगडीत लघु आणि मध्यम उद्योग आहेत. हजारो कर्मचारी काम करत असलेल्या कंपन्याही शहरात आहेत. सध्या “करोना’मुळे कमीत कमी गर्दी व्हावी, असे प्रयत्न कंपन्यांकडून केले जात आहेत.
या दृष्टीने उत्पादन बंद न करता टाटा मोटर्ससारख्या बड्या कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना दिवसाआड सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्धे कर्मचारी एक दिवस काम करणार आणि अर्धे सुट्टी घेणार. सुट्टी घेतलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी कामावर येणार आणि आदल्या दिवशी काम केलेले कर्मचारी सुट्टी घेणार अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.
टाटा मोटर्समधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या कामगारांची पूर्ण काळजी घेत आहे. प्रोडक्शन लाइनवर जास्त गर्दी होऊ नये, यासाठी अर्ध्या कर्मचाऱ्यांना सुट्टी आणि अर्ध्या कर्मचाऱ्यांना काम असे दिवसाआड सुट्टीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे गर्दी कमी होईल आणि कामगारांना “करोना’चा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घेता येईल. त्याचप्रमाणे कंपनीमध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कामगारांसाठी सॅनिटायजर अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसाआड कामाची संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर गुरुवारपासून राबविण्यात येणार आहे. त्यानंतर निरीक्षण करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत.
याच प्रकारे इतरही काही कंपन्यांनी कमीत कमी कर्मचाऱ्यांद्वारे काम सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्पादन बंद करण्याऐवजी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करुन काम सुरु ठेवण्यावर कंपन्यांचा भर दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहन उद्योग मंदीतून जात असल्याने उत्पादन बंद ठेवल्यास कंपनीचे, कर्मचाऱ्यांचे आणि देशाच्या आर्थिक प्रगतीलाही नुकसान होईल. यामुळे कंपन्या सुरक्षेचे उपाय योजून उतादन सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.