लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या प्रतिसादानंतर विधानसभेसाठी तयारी
लोणीकाळभोर- हवेली तालुका हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच विचारसरणीचा असल्याचे लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले. शिरूर-हवेलीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांना पूर्व हवेलीतून चांगले (105712) मतदान झाले. राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्याने पूर्व हवेलीत राष्ट्रवादीला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याने विधानसभेसाठी तयारी करताना पक्षाचे “दादा’ अजित पवार यांनी आता पिंपरीप्रमाणेच पूर्व हवेलीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु, 2014 नंतर येथील कार्यकर्त्यांनी भाजप, शिवसेनेची वाट धरली होती. विविध कारणांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचेही याभागाकडे दुर्लक्ष झाले होते. हिच संधी साधत भाजपने या मतदार संघात मोठी मुसंडी मारली होती. विशेषत: हवेलीतील पूर्व भागात भाजपने पक्षाची पाळंमुळं चांगलीच रूजविली. थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नाचा मोठा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला. परंतु, भाजप-शिवसेना युती सरकारनेही तीच चुक केल्याने दगडा पेक्षा वीट मऊ, यानुसार शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीला संधी दिली.
केंद्रात भाजपच सत्ता आली तरी राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची आकडेवारी पाहता याच उमेदवारांना चांगले मते मिळाली असल्याचे दिसते. यामुळे आगामी काळात राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपाला वरचढ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भाजप, शिवसेनेकरिता धोक्याची घंटा असू शकते. यशवंतचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. याचा फायदा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषत: अजित पवार यांनी या कामी लक्ष दिले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ही हवेलीत फारसे फिरकत नाहीत. विशेष म्हणजे पूर्व हवेलीतील कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण निमंत्रण स्विकारुनही ते कार्यक्रमाला आले नव्हते. परंतु, पवार यांनीही आमा गांभीर्याने तळगळातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. सध्या, जिल्हा परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. याशिवाय पूर्व हवेलीतील अनेक मातब्बर पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हल्लाबोल करून हवेली ताब्यात घेणे राष्ट्रवादीला सोपे आहे. परंतु, हवेली तालुका आपलाच बालेकिल्ला, असे समजून राष्ट्रवादी कॉंग्रेसने गाफील राहू नये, विशेष म्हणजे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही हिच भावना आहे. हवेलीत राष्ट्रवादीला विधासनभेतही वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर माजी उपमुख्यमंत्री अर्थातच अजित पवार यांनी पुढाकार घेणे गरजेचे ठरणार आहे.
- भाजपची पडती बाजू….
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने हवेलीत चांगले प्रस्थ निर्माण केले आहे. आज, प्रत्येक गट आणि गणात भाजपची शाखा आणि कार्यकर्ते आहेत. याचा फायदा निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपला होणार आहे. मात्र, हवेलीत सध्या यशवंत साखर कारखान्याचा प्रश्न मोठा आहे. हा प्रश्न सोडविण्याकरिता भाजपकडून सातत्याने पाठपुरावा होत असला तरी ठोस निर्णय मात्र होत नाही. यामुळे ही भाजपची पडती बाजू मानली जात आहे. रिंगरोड सारखा रेंगाळलेला प्रश्नही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला अडचणीचा ठरू शकतो.